📰 साताऱ्यात शिवसैनिकांची मागणी : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी
सातारा : सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली आहे. जिल्ह्यातील विविध भागांतून कार्यकर्त्यांकडून ही मागणी पुढे येत असून, यामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू असून, सातारा जिल्ह्याच्या राजकारणात, सहकार क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा आहे.
शिवसेनेचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, तर सातारा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे. विशेषतः फलटणसह संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी यासाठी जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.
कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, श्रीमंत संजीवराजे यांचा स्थानिक पातळीवरील संपर्क, कामाचा अनुभव आणि नेतृत्वगुण लक्षात घेता त्यांना संधी दिल्यास पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत होईल. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या मागणीची दखल घेतली जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल, अशी खात्री कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
👉 आता पक्ष नेतृत्वाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)



