निसर्ग संवर्धनाचा ऐतिहासिक संकल्प : माजरवाडी गावात 50 ते 500 वर्षांच्या हेरिटेज वृक्षसंवर्धन उपक्रमाचा शुभारंभ

नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) : प्रतिनिधी :
निसर्ग संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीची शाश्वत जपणूक करण्याच्या उद्देशाने नारायणगाव परिसरातील माजरवाडी गावात एक महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 50, 150, 250 आणि 500 वर्षांपर्यंत टिकणाऱ्या हेरिटेज वृक्षसंवर्धनाच्या संकल्पनेचा हा अभिनव प्रकल्प महाराष्ट्रासह देशासाठी आदर्श ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

हा उपक्रम सुशिलादेवी सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक श्री. संतोष जाधव यांच्या संकल्पनेतून साकार होत असून ग्रामपंचायत मंडळ व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
भौगोलिक परिस्थिती, पर्यावरणीय गरजा आणि नैसर्गिक संसाधनांच्या दीर्घकालीन जतनाचा विचार करून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. निसर्गशक्तीचा आदर्श घेत विकसित भारत, आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शेती आणि पर्यावरणपूरक विकास यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे भविष्यात खारूताई, फुलपाखरे, मधमाश्या, चिमण्या, मुंगूस, कावळे तसेच विविध पशू-पक्ष्यांना सुरक्षित अधिवास उपलब्ध होणार आहे. जैवविविधतेच्या संवर्धनासोबतच स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होणार आहे.
माजरवाडी गावाने घेतलेला हा संकल्प राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक गाव व शहरामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती संरक्षक साखळी निर्माण होऊन पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभी राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
निसर्गसंवर्धन, शाश्वत विकास आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी उचललेले हे पाऊल इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल, असा विश्वास ग्रामस्थ आणि आयोजकांनी व्यक्त केला.
संपर्क : श्री. संतोष जाधव सुशिलादेवी सोशल वेल्फेअर फाउंडेशन मो. 9004438668


