Breaking
25 May 2026, Mon

‘आदरणीय विलासरावजी देशमुख’ नावाचे एक अथांग पर्व

image_pdfई-पेपर PDF डाउनलोडimage_printप्रिंट

‘आदरणीय विलासरावजी देशमुख’ नावाचे एक अथांग पर्व. : विशेष लेख 

   “माणसं संतप्त होणारच, कारण त्यांची सुखं-दुःखं तीव्र असतात. आपण फक्त त्यांचं ऐकून घ्यायचं असतं आणि त्यांचे हात धरून त्यांना संकटातून बाहेर काढायचं असतं…” अस पक्षाला आणि प्रशासनाला सांगणारा लोकनेता म्हणजे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख होय, आज त्यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन.

पुण्यातील अलका टॉकीजच्या चौकातून गरवारे कॉलेजकडे जाणाऱ्या एखाद्या तरुणाच्या डोळ्यांत जे स्वप्न असतं, तेच स्वप्न बाभळगावच्या मातीतून आलेल्या एका राजबिंड्या तरुणाच्या डोळ्यांत होतं. आदरणीय विलासरावजी… नावाप्रमाणेच ज्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात एक अथांग विलास होता; सुसंस्कृततेचा, वक्तृत्वाचा, आणि माणसांवर अतोनात प्रेम करण्याचा!

सार्वजनिक जीवनात असे काही मोजकेच चेहरे होऊन गेले, ज्यांच्या केवळ आठवणीनेही चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांत कृतज्ञतेचे पाणी एकत्र येते. आदरणीय विलासराव देशमुख हे असंच एक ‘उमदं’ रसायन होतं. आज २०२६ च्या रखरखत्या उन्हात, जेव्हा मराठवाड्याची माती तापलेलेली आहे, शेतकरी, कामगार, कष्टकरी अडचणीत आहे, लातूरच वलय डांगाळत आहे, तेव्हा लातूरच्या वेशीवर उभं राहिल्यावर एका माणसाची उणीव काळजाला चटका लावून जाते. ते असते तर? कदाचित संकटाच्या या गडद छायेतही त्याच्या चेहऱ्यावरचं ते आश्वासक हसू पाहून आशेचे पाझर फुटले असते.

आदरणीय विलासरावजी नावाच्या महावृक्षाची पाळंमुळं बाभळगावच्या काळ्या आईत रुजलेली होती. पूर्वजांचा विचारी, सेवेचा वारसा आणि घरातलं पुरोगामी वातावरण, यांमुळे जनसेवेचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. पण या सुप्त गुणांना खऱ्या अर्थाने पैलू पाडले ते पुण्याच्या विधी महाविद्यालयाने आणि गरवारे कॉलेजच्या प्रांगणाने. पुण्याच्या सांस्कृतिक आणि वैचारिक हवेत हा तरुण अधिकच उजळून निघाला.

आदरणीय विलासरावजी कायद्याची पदवी घेऊन जेव्हा लातूरच्या न्यायालयात वकिली करू लागले, तेव्हा न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करण्यापेक्षा त्यांना कोर्टाबाहेरच्या माणसांची दुःखं जास्त ऐकू येत होती. लातूरच्या दुष्काळ निवारण समितीचे सचिव म्हणून काम करताना, दुष्काळी गावांमध्ये पायी फिरून धान्य वाटप करताना या तरुण वकिलांना समजलं की, खरं न्यायालय तर बाहेर आहे आणि तिथे न्यायाची नितांत गरज आहे. मग सुरू झाला . बाभळगावचे ‘सरपंच’ ते राज्याचा ‘शिल्पकार’! आणि देशपातळीवर लातूरचे यशस्वी नेतृत्व असा प्रवास.

सन १९८० ची ती निवडणूक… लातूरच्या राजकारणात एका देखण्या, सुशिक्षित तरुणाने पाऊल ठेवलं आणि विधानसभेची पहिली स्वारी फत्ते केली. त्यानंतर मंत्रिपदाची तालीम सुरू झाली. पहील्यादा आमदार झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत, म्हणजेच १९८२ मध्ये ते गृहराज्यमंत्री झाले. त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयाची इमारत, पोलीस वसाहत आणि शहरात तीन नवी पोलीस ठाणी उभी केली. परिवहन मंत्री म्हणून ‘गाव तिथे एसटी बस’ पोहोचवली, १९८५ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री झाले. महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम, परिवहन आणि संसदीय कामकाज यांसारख्या अष्टपैलू खात्यांचा कारभार सांभाळताना आपली मांड पककी केली. आदरणीय विलासरावांचा कारभारी म्हणून हात मऊ पण पकड घट्ट होती. मांजरा कारखान्याच्या रूपाने त्यांनी सहकाराची पहिली साखरपेरणी केली आणि लातूरचे भाग्य बदलू लागले.

पण नियतीला नेहमीच सरळ रेषा आवडत नाही. सन १९९५ च्या निवडणुकीत विलासरावांना पराभवाचा धक्का बसला. कोणताही सामान्य नेता खचून गेला असता. पण आदरणीय विलासरावजी ‘फिनिक्स’ होते. त्या चार वर्षांच्या काळात त्यांनी कुणावर टीका केली नाही, द्वेष बाळगला नाही. ते पुन्हा लोकांमध्ये गेले, त्यांची गाऱ्हाणी ऐकली. तळापासून सावरून पुन्हा उभं राहण्याची त्यांची ती ऊर्मी अचंबित करणारी होती. परिणामी, १९९९ मध्ये त्यांनी अशी काही झेप घेतली की थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावरच जाऊन विराजमान झाले.

सत्ता चालवतांना ८ पक्षांची आघाडी सांभाळत सरकार चालवणं म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं. पण विलासरावांकडे कमालीचा संयम आणि विलोभनीय संवादकौशल्याची जादू होती. राष्ट्रवादी काँग्रेस असो वा इतर मित्रपक्ष, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे ते ‘कॅप्टन’ होते. हा सत्तेचा काळ समन्वयाचा सुवर्णकाळ आणि बळीराजाचा आधार ठरला.

पूढे मुख्यमंत्री होताच त्यांनी पहिला शब्द टाकला, “माझा बळीराजा अडचणीत आहे, त्याची वीज कापली जाता कामा नये.” त्यांच्याच काळात तब्बल ४५ लाख शेतकऱ्यांची साडेआठ हजार कोटींची कर्जमाफी झाली. माहितीचा अधिकार (RTI) देणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. मुंबईचा कायापालट करताना मोनोरेल आणली, मिठी नदीचा प्रश्न सोडवला आणि गुटखाबंदीचा धाडसी निर्णय घेतला. आदरणीय विलासरावजी हे ‘विश्वासार्हतेचे’ प्रतीक होते. वादळ आल तरी आपली नौका योग्य दिशेने आणि वेगाने चालवून, सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचं सामर्थ्य आदरणीय विलासरावजी नावाच्या सुकाणूमध्ये होत.

आदरणीय विलासराव नुसतेच नेते नव्हते, ते रसिक होते, ‘व्यक्ती आणि वल्ली’ होते. त्यांच्या भाषणात जेवढी धार असायची, तेवढीच मिश्किलता त्यांच्या स्वभावात होती. विधिमंडळात त्यांच्या हजरजबाबी टिपण्यांनी विरोधकांचेही चेहरे हसून खुलायचे. यामुळे त्यांची आजही राजकारणापलीकडचा एक ‘उमदा’ नेता अशीच छाप आहे.

त्यांना संगीताची अफाट जाण होती. सुरेश भटांच्या गझला त्यांना तोंडपाठ असायच्या. चित्रपट आणि नाटकांप्रमाणेच त्यांनी महाराष्ट्राच्या लावणी आणि तमाशा कलावंतांनाही मानधन वाढवून सन्मान दिला. विद्यापीठांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांचे नाव देताना त्यांच्यातील सांस्कृतिक जाणिवा स्पष्ट दिसायच्या. ‘वर्षा’ बंगल्यावर येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याला आदराने भेटणारे, वैशालीताईंच्या साथीने आपल्या मुलांना उत्तम संस्कार देणारे ते कुटुंबवत्सल ‘अण्णा’ होते.

आज विलासरावांची आठवण दाटून येते. राजकारणात विचारधारेचा गोंधळ उडाला आहे, समाजमन दुभंगल आहे, अशा वेळी सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा तो दिलदार आणि हसतमुख चेहरा आज आपल्यात नाही, ही जाणीव राज्याला अधिकच विकल करते.

          पण विलासरावांचे विचार संपलेले नाहीत. त्यांनी शिकवलं की, संकट कितीही मोठं असो, लोकसहभागातून त्यावर मात करता येते. आज आदरणीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त केवळ त्यांचे स्मरण करणे पुरेसे नाही, तर त्यांनी जपलेला ‘विश्वास’, त्यांनी दाखवलेला ‘विकास’ आणि त्यांची ‘विचारनिष्ठा’ हाच आपला पुढचा मार्ग असला पाहिजे.

अशा आफाट स्मरणशक्तीच्या, प्रसन्न, कनवाळू आणि शब्दाला जागणाऱ्या लोकनेत्याला, महाराष्ट्राच्या या राजबिंड्या पुत्राला मानाचा मुजरा!

लेखक :  राहुल हरिभाऊ इंगळे पाटील
मो. ९८९०५७७१२८
दि. २६ मे २०२६

📢 झुंजार भारत | अधिकृत WhatsApp Channel
👉 Channel Join करा
ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

📢 WhatsApp Channel Join