रॅगिंगमुक्त परिसरासाठी श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचा पुढाकार

‘अँटी-रॅगिंग’ भित्तिपत्रकांचे दिमाखात अनावरण
म्हसवड, दि. १६ (प्रतिनिधी):
रॅगिंग ही केवळ एक वाईट प्रथा नसून विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे. या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथे ‘अग्रणी महाविद्यालय उपक्रम’ व ‘अँटी-रॅगिंग समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने “रॅगिंग जागरूकता : अँटी-रॅगिंग भित्तिपत्रकांचा” अनावरण सोहळा सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) उत्साहात पार पडला.
या भित्तिपत्रकांचे अनावरण मुधोजी कॉलेज, फलटण येथील निवृत्त प्रा. उज्वला पिसाळ-देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
🟡 “रॅगिंगविरुद्ध न घाबरता आवाज उठवा”
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. उज्वला पिसाळ-देशमुख म्हणाल्या,
“रॅगिंगसारख्या गैरप्रकारांना बळी न पडता विद्यार्थ्यांनी धैर्याने त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्वरित महाविद्यालयाच्या अँटी-रॅगिंग समितीशी संपर्क साधावा. एकमेकांचा आदर राखणे आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.”
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य अॅड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने तसेच महिंद्रा ग्रुप नांदी फाउंडेशनच्या ट्रेनर कोमल बनकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. संजय दिक्षित सर होते, तर आयक्यूएसी (IQAC) चेअरमन प्रा. रणवरे सर यांची विशेष उपस्थिती लाभली.
या उपक्रमाचे नियोजन अँटी-रॅगिंग समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. प्रज्ञा माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. समिती सदस्य प्रा. बी. बी. मैद, प्रा. ए. आर. माने मॅडम, प्रा. अॅड. डॉ. कुलकर्णी मॅडम व प्रा. आर. जे. पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला. भित्तिपत्रकांच्या माध्यमातून रॅगिंगचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत प्रभावी माहिती देण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. ए. आर. माने मॅडम यांनी उपस्थित पाहुणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात शिस्त, सुरक्षितता आणि सौहार्दाचे वातावरण अधिक दृढ होईल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.