‘आदरणीय विलासरावजी देशमुख’ नावाचे एक अथांग पर्व

‘आदरणीय विलासरावजी देशमुख’ नावाचे एक अथांग पर्व. : विशेष लेख 

   “माणसं संतप्त होणारच, कारण त्यांची सुखं-दुःखं तीव्र असतात. आपण फक्त त्यांचं ऐकून घ्यायचं असतं आणि त्यांचे हात धरून त्यांना संकटातून बाहेर काढायचं असतं…” अस पक्षाला आणि प्रशासनाला सांगणारा लोकनेता म्हणजे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख होय, आज त्यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन.

पुण्यातील अलका टॉकीजच्या चौकातून गरवारे कॉलेजकडे जाणाऱ्या एखाद्या तरुणाच्या डोळ्यांत जे स्वप्न असतं, तेच स्वप्न बाभळगावच्या मातीतून आलेल्या एका राजबिंड्या तरुणाच्या डोळ्यांत होतं. आदरणीय विलासरावजी… नावाप्रमाणेच ज्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात एक अथांग विलास होता; सुसंस्कृततेचा, वक्तृत्वाचा, आणि माणसांवर अतोनात प्रेम करण्याचा!

सार्वजनिक जीवनात असे काही मोजकेच चेहरे होऊन गेले, ज्यांच्या केवळ आठवणीनेही चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांत कृतज्ञतेचे पाणी एकत्र येते. आदरणीय विलासराव देशमुख हे असंच एक ‘उमदं’ रसायन होतं. आज २०२६ च्या रखरखत्या उन्हात, जेव्हा मराठवाड्याची माती तापलेलेली आहे, शेतकरी, कामगार, कष्टकरी अडचणीत आहे, लातूरच वलय डांगाळत आहे, तेव्हा लातूरच्या वेशीवर उभं राहिल्यावर एका माणसाची उणीव काळजाला चटका लावून जाते. ते असते तर? कदाचित संकटाच्या या गडद छायेतही त्याच्या चेहऱ्यावरचं ते आश्वासक हसू पाहून आशेचे पाझर फुटले असते.

आदरणीय विलासरावजी नावाच्या महावृक्षाची पाळंमुळं बाभळगावच्या काळ्या आईत रुजलेली होती. पूर्वजांचा विचारी, सेवेचा वारसा आणि घरातलं पुरोगामी वातावरण, यांमुळे जनसेवेचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. पण या सुप्त गुणांना खऱ्या अर्थाने पैलू पाडले ते पुण्याच्या विधी महाविद्यालयाने आणि गरवारे कॉलेजच्या प्रांगणाने. पुण्याच्या सांस्कृतिक आणि वैचारिक हवेत हा तरुण अधिकच उजळून निघाला.

आदरणीय विलासरावजी कायद्याची पदवी घेऊन जेव्हा लातूरच्या न्यायालयात वकिली करू लागले, तेव्हा न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करण्यापेक्षा त्यांना कोर्टाबाहेरच्या माणसांची दुःखं जास्त ऐकू येत होती. लातूरच्या दुष्काळ निवारण समितीचे सचिव म्हणून काम करताना, दुष्काळी गावांमध्ये पायी फिरून धान्य वाटप करताना या तरुण वकिलांना समजलं की, खरं न्यायालय तर बाहेर आहे आणि तिथे न्यायाची नितांत गरज आहे. मग सुरू झाला . बाभळगावचे ‘सरपंच’ ते राज्याचा ‘शिल्पकार’! आणि देशपातळीवर लातूरचे यशस्वी नेतृत्व असा प्रवास.

सन १९८० ची ती निवडणूक… लातूरच्या राजकारणात एका देखण्या, सुशिक्षित तरुणाने पाऊल ठेवलं आणि विधानसभेची पहिली स्वारी फत्ते केली. त्यानंतर मंत्रिपदाची तालीम सुरू झाली. पहील्यादा आमदार झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत, म्हणजेच १९८२ मध्ये ते गृहराज्यमंत्री झाले. त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयाची इमारत, पोलीस वसाहत आणि शहरात तीन नवी पोलीस ठाणी उभी केली. परिवहन मंत्री म्हणून ‘गाव तिथे एसटी बस’ पोहोचवली, १९८५ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री झाले. महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम, परिवहन आणि संसदीय कामकाज यांसारख्या अष्टपैलू खात्यांचा कारभार सांभाळताना आपली मांड पककी केली. आदरणीय विलासरावांचा कारभारी म्हणून हात मऊ पण पकड घट्ट होती. मांजरा कारखान्याच्या रूपाने त्यांनी सहकाराची पहिली साखरपेरणी केली आणि लातूरचे भाग्य बदलू लागले.

पण नियतीला नेहमीच सरळ रेषा आवडत नाही. सन १९९५ च्या निवडणुकीत विलासरावांना पराभवाचा धक्का बसला. कोणताही सामान्य नेता खचून गेला असता. पण आदरणीय विलासरावजी ‘फिनिक्स’ होते. त्या चार वर्षांच्या काळात त्यांनी कुणावर टीका केली नाही, द्वेष बाळगला नाही. ते पुन्हा लोकांमध्ये गेले, त्यांची गाऱ्हाणी ऐकली. तळापासून सावरून पुन्हा उभं राहण्याची त्यांची ती ऊर्मी अचंबित करणारी होती. परिणामी, १९९९ मध्ये त्यांनी अशी काही झेप घेतली की थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावरच जाऊन विराजमान झाले.

सत्ता चालवतांना ८ पक्षांची आघाडी सांभाळत सरकार चालवणं म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं. पण विलासरावांकडे कमालीचा संयम आणि विलोभनीय संवादकौशल्याची जादू होती. राष्ट्रवादी काँग्रेस असो वा इतर मित्रपक्ष, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे ते ‘कॅप्टन’ होते. हा सत्तेचा काळ समन्वयाचा सुवर्णकाळ आणि बळीराजाचा आधार ठरला.

पूढे मुख्यमंत्री होताच त्यांनी पहिला शब्द टाकला, “माझा बळीराजा अडचणीत आहे, त्याची वीज कापली जाता कामा नये.” त्यांच्याच काळात तब्बल ४५ लाख शेतकऱ्यांची साडेआठ हजार कोटींची कर्जमाफी झाली. माहितीचा अधिकार (RTI) देणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. मुंबईचा कायापालट करताना मोनोरेल आणली, मिठी नदीचा प्रश्न सोडवला आणि गुटखाबंदीचा धाडसी निर्णय घेतला. आदरणीय विलासरावजी हे ‘विश्वासार्हतेचे’ प्रतीक होते. वादळ आल तरी आपली नौका योग्य दिशेने आणि वेगाने चालवून, सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचं सामर्थ्य आदरणीय विलासरावजी नावाच्या सुकाणूमध्ये होत.

आदरणीय विलासराव नुसतेच नेते नव्हते, ते रसिक होते, ‘व्यक्ती आणि वल्ली’ होते. त्यांच्या भाषणात जेवढी धार असायची, तेवढीच मिश्किलता त्यांच्या स्वभावात होती. विधिमंडळात त्यांच्या हजरजबाबी टिपण्यांनी विरोधकांचेही चेहरे हसून खुलायचे. यामुळे त्यांची आजही राजकारणापलीकडचा एक ‘उमदा’ नेता अशीच छाप आहे.

त्यांना संगीताची अफाट जाण होती. सुरेश भटांच्या गझला त्यांना तोंडपाठ असायच्या. चित्रपट आणि नाटकांप्रमाणेच त्यांनी महाराष्ट्राच्या लावणी आणि तमाशा कलावंतांनाही मानधन वाढवून सन्मान दिला. विद्यापीठांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांचे नाव देताना त्यांच्यातील सांस्कृतिक जाणिवा स्पष्ट दिसायच्या. ‘वर्षा’ बंगल्यावर येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याला आदराने भेटणारे, वैशालीताईंच्या साथीने आपल्या मुलांना उत्तम संस्कार देणारे ते कुटुंबवत्सल ‘अण्णा’ होते.

आज विलासरावांची आठवण दाटून येते. राजकारणात विचारधारेचा गोंधळ उडाला आहे, समाजमन दुभंगल आहे, अशा वेळी सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा तो दिलदार आणि हसतमुख चेहरा आज आपल्यात नाही, ही जाणीव राज्याला अधिकच विकल करते.

          पण विलासरावांचे विचार संपलेले नाहीत. त्यांनी शिकवलं की, संकट कितीही मोठं असो, लोकसहभागातून त्यावर मात करता येते. आज आदरणीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त केवळ त्यांचे स्मरण करणे पुरेसे नाही, तर त्यांनी जपलेला ‘विश्वास’, त्यांनी दाखवलेला ‘विकास’ आणि त्यांची ‘विचारनिष्ठा’ हाच आपला पुढचा मार्ग असला पाहिजे.

अशा आफाट स्मरणशक्तीच्या, प्रसन्न, कनवाळू आणि शब्दाला जागणाऱ्या लोकनेत्याला, महाराष्ट्राच्या या राजबिंड्या पुत्राला मानाचा मुजरा!

लेखक :  राहुल हरिभाऊ इंगळे पाटील
मो. ९८९०५७७१२८
दि. २६ मे २०२६




आत्मनिर्भर भारत निर्माण होणं काळाची गरज…✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

 

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

आजच्या जागतिक परिस्थितीकडे पाहिले असता, राष्ट्रांमधील वाढती स्पर्धा, वर्चस्वाची लढाई आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवण्याची प्रवृत्ती यामुळे युद्धसदृश्य परिस्थिती वारंवार निर्माण होताना दिसते. इतिहासात झालेले पहिले व दुसरे महायुद्ध हे केवळ घटनाच नव्हत्या, तर संपूर्ण मानवजातीला हादरवून टाकणारे अनुभव होते. लाखो लोकांचा मृत्यू, प्रचंड विध्वंस आणि असंख्य कुटुंबांचे उद्ध्वस्त आयुष्य — या सर्वांनी जगाला मोठा धडा दिला; परंतु दुर्दैवाने त्या धड्याचा पुरेसा उपयोग झालेला दिसत नाही.

युद्धाच्या कथा कदाचित ऐकायला रोमांचक वाटू शकतात, पण वास्तवात त्या वेदनादायी असतात. युद्ध सुरू असताना सामान्य माणसाला ज्या यातना सहन कराव्या लागतात, त्या शब्दांत मांडणे कठीण आहे. आपल्या डोळ्यासमोर होणारा विनाश, आप्तस्वकीयांचा मृत्यू आणि असहाय्यता — या सर्व गोष्टी मनाला हेलावून टाकतात.

आजही जगात साम्राज्यवादी विचारसरणी, नैसर्गिक साधनसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्याची स्पर्धा आणि आर्थिक वर्चस्वाच्या हव्यासामुळे संघर्ष निर्माण होतो. काही मोजक्या शक्तिशाली व्यक्ती किंवा राष्ट्रांच्या महत्त्वाकांक्षेमुळे संपूर्ण मानवजातीला त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कडक नियमावली तयार करून तिचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
जगातील विविध देशांमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे एक देश दुसऱ्यावर अवलंबून राहतो. हे परस्परावलंबित्व जर संतुलित नसेल, तर ते संघर्षाचे कारण बनते. आजच्या काळात पेट्रोल, गॅस आणि इतर ऊर्जास्रोतांसाठी परदेशांवर अवलंबून राहण्याचे परिणाम आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. पुरवठा खंडित झाला की सामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो — हॉटेल व्यवसाय बंद पडणे, इंधनासाठी रांगा, दैनंदिन जीवन विस्कळीत होणे याची उदाहरणे आपण पाहिली आहेत.

यावर एकमेव उपाय म्हणजे स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भरता. प्रत्येक राष्ट्राने आपल्या उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तंत्रज्ञान, उद्योग, शेती आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये स्वतःची क्षमता विकसित करणे ही काळाची गरज आहे.

भारताच्या संदर्भात पाहिले तर “आत्मनिर्भर भारत” ही संकल्पना केवळ आर्थिक धोरण नाही, तर एक व्यापक राष्ट्रीय दृष्टीकोन आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, आयात कमी करणे, संशोधन आणि नवकल्पनांना चालना देणे, तसेच प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवणे — या सर्व गोष्टी या संकल्पनेचा भाग आहेत.
आपण महासत्ता होण्याचा केवळ नारा देण्यापेक्षा, देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, सुरक्षित आणि सक्षम जीवन जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी, स्वयंपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण झाली, तरच खऱ्या अर्थाने राष्ट्र मजबूत होईल.

आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी सरकारसोबतच प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, लोकसंख्या आणि मागणी — या पाच घटकांवर आधारित विकासाचा पाया अधिक मजबूत करणे गरजेचे आहे.
भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित, समृद्ध आणि सशक्त भारत घडवायचा असेल, तर आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठोस पावले उचलणे हीच काळाची खरी गरज आहे.
✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.
(M.A., LL.M., M.A.J.M.C.)
भारत निर्माण आंदोलन | The Last Revolution




राष्ट्रातील पायाभूत सुविधा मजबुतीने निर्माण करणे काळाची गरज : लेख ✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

विशेष लेख :

आजच्या जागतिक परिस्थितीत कोणत्याही राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पायाभूत सुविधांची भक्कम उभारणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारत महासत्ता आणि विश्वगुरू होण्याची आकांक्षा व्यक्त करीत असताना स्वावलंबन, स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठोस पावले उचलणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भारतीय संस्कृतीने जगाला “तमसो मा ज्योतिर्गमय” आणि “अत्त दीप भव” यांसारखी उदात्त तत्त्वे दिली. अंधारातून प्रकाशाकडे जाणे आणि स्वतः प्रकाशमान होणे हा या तत्त्वांचा मूलभूत संदेश आहे. मात्र आजच्या परिस्थितीत या मूल्यांचा विसर तर पडत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्राच्या विकासाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शासनयंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि समाजाने या तत्त्वांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षांमुळे अनेक देशांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होताना दिसत आहे. उदाहरणार्थ, जागतिक राजकीय तणावामुळे इंधन आणि गॅससारख्या आवश्यक वस्तूंवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. यामुळे देशातील नागरिकांना स्वयंपाकासाठी लागणारा गॅस उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी कार्यक्रम पुढे ढकलावे लागत असून, शहरांमधील खानावळी चालवणाऱ्यांना पर्याय म्हणून चुली पेटवाव्या लागत असल्याचेही दिसून येते.
या परिस्थितीमुळे एक प्रश्न निर्माण होतो—जीवनावश्यक वस्तूंसाठी आपण अजूनही इतर राष्ट्रांवर अवलंबून का आहोत? गॅस, वीज, शेतीसाठी लागणारी खते, बियाणे आणि तंत्रज्ञान यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर देशातच होणे आवश्यक आहे. देश स्वयंपूर्ण झाला तर जागतिक संकटांच्या काळातही नागरिकांना मूलभूत अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
स्वावलंबन म्हणजे केवळ घोषणांमध्ये मर्यादित राहणे नव्हे. ज्या क्षेत्रांत आपण आयात किंवा परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून आहोत, त्या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उद्योग, संशोधन आणि तंत्रज्ञान अधिक सक्षम करणे हेच खरे आत्मनिर्भरतेचे लक्षण आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि संशोधन यामध्ये मजबूत पायाभूत सुविधा उभारल्यास देश आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतो.
गरिबी निर्मूलनाबाबत अनेक वर्षांपासून विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र केवळ अनुदान किंवा मोफत योजनांमुळे कायमस्वरूपी गरिबी दूर होत नाही, असेही अनेक तज्ज्ञांचे मत आहे. रोजगारनिर्मिती, उद्योगविकास आणि संशोधनासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारल्यास समाजातील दुर्बल घटकांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळू शकते.
पायाभूत सुविधांचा विकास केल्याने केवळ उद्योगच नव्हे तर रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. त्यामुळे गरिबांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळते. संशोधन, उत्पादन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्यास देशाची आर्थिक ताकद वाढते आणि गरिबी कमी होण्यास मदत होते.
आजच्या तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याची गरज आहे. देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण भारत घडविणे शक्य होईल.

लेखक:
— ॲड. पुजा प्रकाश एन.
(M.A., LL.M., M.A.J.M.C.)
भारत निर्माण आंदोलन – The Last Revolution