🌿 नात्यांचे तीन मुखवटे 🌿 जगण्याची आणि जपण्याची कला

  1. नात्यांचे तीन मुखवटे: ललित लेख 

जगण्याची आणि जपण्याची कला

नात्यांची वीण टिकवण्यासाठी कधी डोळस अंधत्व, कधी सहनशील बहिरेपणा आणि कधी संयमी मौन स्वीकारावं लागतं. समोरच्याच्या उणिवांकडे दुर्लक्ष, कटू शब्दांना माफ करणं आणि योग्य वेळी शांत राहणं हीच नाती जपण्याची खरी कला आहे. प्रेमासाठी केलेला हा अदृश्य अभिनयच नात्यांना दीर्घायुष्य देतो.

नजरेवरती पडदा टाकू, उणिवांचा हा नजारा,

चूक तुझी ही भासे मजला, देखणा तुझा नखरा।

डोळस सोडून अंधार स्वीकारू, प्रेमाच्या या रीतीने,

संसाराची वीण सांधू, समजूतदार हसण्याने॥ 

जगण्याची आणि जपण्याची कला

नात्यांची वीण टिकवण्यासाठी कधी डोळस अंधत्व, कधी सहनशील बहिरेपणा आणि कधी संयमी मौन स्वीकारावं लागतं. समोरच्याच्या उणिवांकडे दुर्लक्ष, कटू शब्दांना माफ करणं आणि योग्य वेळी शांत राहणं हीच नाती जपण्याची खरी कला आहे. प्रेमासाठी केलेला हा अदृश्य अभिनयच नात्यांना दीर्घायुष्य देतो.

नजरेवरती पडदा टाकू, उणिवांचा हा नजारा,

चूक तुझी ही भासे मजला, देखणा तुझा नखरा।

डोळस सोडून अंधार स्वीकारू, प्रेमाच्या या रीतीने,

संसाराची वीण सांधू, समजूतदार हसण्याने॥ १ ॥

तिखट बोलांची धार येता, कानांवरती आवरणे,

भाषण तुझे गाणे वाटे, लयीत तुजला सावरणे।

क्षमेचा हा कवच पांघरू, गर्वाची ही सोडून ढाल,

शांततेच्या वाऱ्याने मग, नात्याची ही राहे खुशाल॥ २ ॥

शब्दांची ही शस्त्रे आवरू, ओठांवरती शांतता,

मौनदीप हा मनात लावू, संपवून ही कटुता।

कसरत ही अभिनयाची, प्रेमासाठी केले

नात्यांची ही वेल सदा, शब्दावाचून बहरलेली॥ ३ ॥

मानवी आयुष्य म्हणजे नात्यांचा एक सुंदर पण नाजूक कोलाज. ही नाती कधी रेशमी धाग्यासारखी मऊ असतात, तर कधी काचेसारखी संवेदनशील. नात्यांचं हे विणकाम टिकवून ठेवणं ही एक मोठी जीवनकला आहे. ही जीवनकला साध्य करण्यासाठी आपल्या मुद्रेवर तीन मुखवटे परीधान करावे लागतील. हे मुखवटे म्हणजेच आंधळा, बहिरा आणि मुका होता आले पाहीजे. हा केवळ सुवीचार किंवा केवळ उपदेश नसून नातेसंबंधांच्या मंदिरातील ‘मौनदीप’ आहेत. नाती टिकवण्यासाठी एकाच व्यक्तीला अनेकदा हे तीन मुखवटे एकाच वेळी परिधान करावे लागतात. ही कला ज्याला जमली तो खरी नाती जपू आणि वाढवू शकतो.

अर्थात आपल्या नात्यात पहिला मुखवटा येतो तो म्हणजे ‘आंधळेपणा’. याचा अर्थ असा नाही की, धृतराष्ट्र सारख अंधत्व स्विकारायच तर डोळस अंधत्व असल पाहीजे. आपल्याला समोरच्याच्या चुका दिसत असतात, पण, कधी कधी डोळे असूनही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, म्हणजेच प्रेमाची पट्टी डोळ्यावर बांधणं गरजेचं असतं. समोरच्याच्या उणिवांकडे काणाडोळा करून त्याच्यातील चांगुलपणा शोधणं, हा आंधळेपणा अगतिकतेचा नसून तो समजूतदारपणाचा असतो. सर्व काही पाहणारी नजर नाती वाचवू शकत नाही; कधी कधी मुद्दाम मिटलेले डोळेच घर आणि मनं टिकवतात.

दुसरा मुखवटा आहे ‘बहिरेपणा’. नात्यांच्या प्रवासात कधी कधी कटू शब्दांचे बाण सुटतात, टीकांचे वादळ येते. अशा वेळी अहंकाराला बाजूला सारून ‘क्षमेची शाल’ पांघरून बहिरे व्हावे लागते. टोचणारे शब्द जर मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवले, तर नात्याचा ओलावा आटायला वेळ लागत नाही. ऐकूनही न ऐकल्यासारखं करणं ही सहनशीलतेची सर्वोच्च पायरी आहे. यामुळे नात्यातील संवाद जरी थांबला, तरी विसंवाद टाळता येतो.

तिसरा आणि अत्यंत कठीण मुखवटा म्हणजे ‘मुके होणं’. जेव्हा अंतर्मनात शब्दांची धार तीव्र असते, उत्तर देण्याची पूर्ण क्षमता असते, तेव्हा ओठांवर ‘मौनाचा दीप’ लावणं हेच संयमाचं लक्षण आहे. मौन म्हणजे केवळ शांत बसणे नव्हे, तर नात्यांवर चढवलेलं ते एक सुगंधी चंदन आहे. शब्दांनी झालेली जखम भरून येत नाही, पण योग्य वेळी धरलेलं मौन नात्याचं तुटणारं घर पुन्हा सांधू शकतं.

एकाच माणसाला हे तीन चेहरे सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. हे मुखवटे म्हणजे ढोंगीपणा नसून तो एक ‘अदृश्य अभिनय’ आहे, जो केवळ प्रेमापोटी केला जातो. नात्यातलं घर हे विटा-मातीपेक्षा शब्दांच्या संयमावर आणि शांततेवर उभं असतं. शेवटी, नाती शब्दांनी नाही, तर अनेकदा न बोललेल्या मौनानेच अधिक काळ टिकतात आणि बहरतात. या तीन अवस्थांतूनच नात्यांचं नाजूक विणकाम अखंड आणि अभेद्य राहते. तर मग असे मुखवटे घालून तर पहा ……

राहूल हरिभाऊ इंगळे-पाटील

रा.करकट्टा ता.जि.लातूर

मोबाईल ९८९०५७७१२८     




राष्ट्रातील पायाभूत सुविधा मजबुतीने निर्माण करणे काळाची गरज : लेख ✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

विशेष लेख :

आजच्या जागतिक परिस्थितीत कोणत्याही राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पायाभूत सुविधांची भक्कम उभारणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारत महासत्ता आणि विश्वगुरू होण्याची आकांक्षा व्यक्त करीत असताना स्वावलंबन, स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठोस पावले उचलणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भारतीय संस्कृतीने जगाला “तमसो मा ज्योतिर्गमय” आणि “अत्त दीप भव” यांसारखी उदात्त तत्त्वे दिली. अंधारातून प्रकाशाकडे जाणे आणि स्वतः प्रकाशमान होणे हा या तत्त्वांचा मूलभूत संदेश आहे. मात्र आजच्या परिस्थितीत या मूल्यांचा विसर तर पडत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्राच्या विकासाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शासनयंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि समाजाने या तत्त्वांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षांमुळे अनेक देशांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होताना दिसत आहे. उदाहरणार्थ, जागतिक राजकीय तणावामुळे इंधन आणि गॅससारख्या आवश्यक वस्तूंवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. यामुळे देशातील नागरिकांना स्वयंपाकासाठी लागणारा गॅस उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी कार्यक्रम पुढे ढकलावे लागत असून, शहरांमधील खानावळी चालवणाऱ्यांना पर्याय म्हणून चुली पेटवाव्या लागत असल्याचेही दिसून येते.
या परिस्थितीमुळे एक प्रश्न निर्माण होतो—जीवनावश्यक वस्तूंसाठी आपण अजूनही इतर राष्ट्रांवर अवलंबून का आहोत? गॅस, वीज, शेतीसाठी लागणारी खते, बियाणे आणि तंत्रज्ञान यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर देशातच होणे आवश्यक आहे. देश स्वयंपूर्ण झाला तर जागतिक संकटांच्या काळातही नागरिकांना मूलभूत अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
स्वावलंबन म्हणजे केवळ घोषणांमध्ये मर्यादित राहणे नव्हे. ज्या क्षेत्रांत आपण आयात किंवा परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून आहोत, त्या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उद्योग, संशोधन आणि तंत्रज्ञान अधिक सक्षम करणे हेच खरे आत्मनिर्भरतेचे लक्षण आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि संशोधन यामध्ये मजबूत पायाभूत सुविधा उभारल्यास देश आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतो.
गरिबी निर्मूलनाबाबत अनेक वर्षांपासून विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र केवळ अनुदान किंवा मोफत योजनांमुळे कायमस्वरूपी गरिबी दूर होत नाही, असेही अनेक तज्ज्ञांचे मत आहे. रोजगारनिर्मिती, उद्योगविकास आणि संशोधनासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारल्यास समाजातील दुर्बल घटकांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळू शकते.
पायाभूत सुविधांचा विकास केल्याने केवळ उद्योगच नव्हे तर रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. त्यामुळे गरिबांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळते. संशोधन, उत्पादन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्यास देशाची आर्थिक ताकद वाढते आणि गरिबी कमी होण्यास मदत होते.
आजच्या तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याची गरज आहे. देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण भारत घडविणे शक्य होईल.

लेखक:
— ॲड. पुजा प्रकाश एन.
(M.A., LL.M., M.A.J.M.C.)
भारत निर्माण आंदोलन – The Last Revolution