मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

 

फलटण : येथील मुधोजी महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रशासकिय कर्मचारी तसेच प्राध्यापकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेदरम्यान अटीतटीच्या आणि रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रा. डॉ. योगेश माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर विक्की गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
विजेत्यांचे महाविद्यालय प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेमुळे कर्मचारी वर्गामध्ये मध्ये क्रीडाभावना व स्पर्धात्मक वृत्तीला चालना मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.




मुधोजी महाविद्यालयात अभिरूप निवडणूक प्रक्रिया उत्साहात संपन्न


फलटण : विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा तसेच मतदानाचे महत्त्व समजावे या उद्देशाने फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागामार्फत “अभिरूप निवडणूक प्रक्रिया (Mock Electoral Process)” हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

   या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कलाशाखा प्रमुख डॉ. ए. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर निवडणूक प्रक्रियेचे आयोजन राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले असून हा उपक्रम प्रा. गिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. त्यांना प्रा. प्रियांका शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमात महाविद्यालयातील विविध विद्या शाखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या अभिरूप निवडणूक प्रक्रियेत एकूण ५३६ विद्यार्थ्यांनी व १०२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी १०.०० वाजता मतदानास सुरुवात करण्यात आली असून ही प्रक्रिया दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरळीतपणे पार पडली. त्यानंतर दुपारी ३.०० वाजता मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.
या निवडणुकीत एकूण ६२६ मते पडली. त्यापैकी १६ मते बाद झाली, तर १३ मते NOTA ला मिळाली. निकालानुसार बी.ए. भाग दोनची विद्यार्थिनी तनुजा कुमकाले हिने २८१ मते मिळवून ११९ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. तर बी.ए. भाग एकचा विद्यार्थी आदित्य रणदिवे याला १५६ मते, तर बी.ए. भाग तीनचा विद्यार्थी विनय शिंदे याला १६२ मते मिळाली.
या निवडणूक प्रक्रियेत धीरज जाधव यांनी केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच शिवाजंली रणदिवे (पहिले मतदान अधिकारी), श्रुतिका कदम (दुसरे मतदान अधिकारी) आणि पायल जाधव (तिसरे मतदान अधिकारी) यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीतील मतदान प्रक्रिया, गुप्त मतदान प्रणाली, मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरला असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी –  प्रा. श्रेयस कांबळे

 

 

मराठी भाषेतील साहित्यिक यांचे कार्य उत्तम असून त्यांचे साहित्य हे दिशादर्शक व प्रेरणादाय आहे.-प्रा. श्रेयस कांबळे

मराठी भाषेतील साहित्यिक यांचे कार्य उत्तम असून त्यांचे साहित्य हे दिशादर्शक व प्रेरणादाय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे असे मत फलटण येथील विधी महाविद्यालयाचे प्रा. श्रेयस कांबळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती येथे मराठी भाषा गौरव दिन वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मांडले.

मराठी साहित्य हे आज जगभर पोहोचलेले दिसते. यामध्ये संत पंथ थोर युगपुरुष साहित्यिक कवी लेखक यांचे फार मोठे योगदान आहे. मराठी भाषा ही साधी सरळ सोपी असून ती वापरायला अधिक दर्जेदार आहे या भाषेचा गोडवा इतर भाषेपेक्षा फार निराळा आहे त्यामुळे ही भाषा आज जगभर पोहोचलेली दिसत असून त्याचा विस्तार व वाढ करण्याचे काम आपणा सर्वांच्या आहे.

यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका जाधव एम. डी., ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे, विद्या जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रेयस कांबळे पुढे म्हणाले की छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेतून राज्यकारभार सुरू करून एक समाजापुढे आदर्श निर्माण केला व मराठी भाषेचा विस्तार सुरू झाला. पुढे हीच मराठी भाषा वाढविण्यामध्ये अनेक थोर विभूतींनी आपले योगदान दिले आहे.

चक्रधर स्वामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तसेच अनेक थोर संत यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपल्या वाणीने व लेखणीने मोठे योगदान दिले आहे. ही मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांचे आहे त्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करूया.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे म्हणाले की मराठी भाषेवर अनेक आक्रमणे झाले अतिक्रमणे झाली तरी मराठी भाषा आजही जशीच्या तशी ताट मानेने उभी आहे.

मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे यासाठी दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे व इतर भाषेतील शब्द वापरणे टाळणे काळाची गरज आहे.

थोर संत, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व साहित्यिकांनी दिलेल्या योगदानातून मराठी भाषेचा कणा ताठ आहे त्यामुळे ही भाषा आपली मातृभाषा म्हणून प्रत्येकाने आईप्रमाणे जपली पाहिजे मातृभाषा टिकली तरच आपल्या अस्तित्व टिकेल त्यामुळे माय मराठी ला आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात आईचे स्थान दिले पाहिजे.

यावेळी सौ जाधव एम.डी. उपशिक्षक गायकवाड ए. आय. तसेच विद्यार्थीनी तनया जगताप यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनवलकर ए. ए. यांनी केले तर आभार कु. हन्नूरे एस.एम. यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.