म्हसवड येथे मंत्री भरतशेठ गोगावले यांची बाबर कुटुंबीयांना सदिच्छा भेट

म्हसवड (ता. माण) येथे महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोद्यान मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी बाबर कुटुंबीयांना सदिच्छा भेट देत आपुलकीचा संवाद साधला.
यावेळी ॲड. इंद्रजीत बाबर व कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी मंत्री महोदयांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. भेटीदरम्यान मंत्री गोगावले यांनी नवदांपत्य इंद्रजीत व हर्षदा यांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उद्योजक निखिल देवकर व प्रा. शरयू देवकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थितांनी मंत्री महोदयांशी विविध विषयांवर चर्चा करत समाधान व्यक्त केले.
सदर भेटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.




🎤 जबरदस्त कविता सादरीकरण! ‘जग हे केमिस्ट्री’ — प्रा. डॉ. काळबेरे

🚨 ब्रेकिंग न्यूज | साप्ताहिक झुंजार भारत
🔴 ही कविता ऐकली नाही तर मोठी चूक होईल!
🟡 🎤 सुंदर कविता सादरीकरण!
‘जग हे केमिस्ट्री’ ही कविता मुधोजी महाविद्यालयात प्रा. डॉ. रविंद्र काळबेरे यांनी सादर केली.

🔗 संपूर्ण विडिओ पहा:

— झुंजार भारत

बातमी साठी संपर्क:
संपादक: ॲड. राजू भोसले
Email. zunjarbharat@gmail.com




माणगाव परिषदेतून सामाजिक बदलाची खरी सुरुवात – जिल्हाधिकारी अमोल येडगे

* ‘बहिष्कृत परिषदे’चा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
* राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

*कोल्हापूर, दि. २१* : समाजातील अनिष्ट प्रथा आणि परंपरा नष्ट करण्यासाठी १९२० साली आयोजित करण्यात आलेल्या माणगाव परिषदेतून खऱ्या अर्थाने सामाजिक बदलाची सुरुवात झाली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ व २२ मार्च १९२० रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्रातील पहिली ‘बहिष्कृत परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेचा १०६ वा वर्धापन दिन आज माणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, माणगाव परिषदेत संमत करण्यात आलेल्या १५ ठरावांवरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढील कार्याची दिशा कशी निश्चित झाली, याची प्रचिती येते. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहिष्कृत वर्गाच्या कल्याणासाठी जी महत्त्वाची पावले उचलली, त्यांचा समावेश पुढे बाबासाहेबांनी भारतीय संविधानात केला. संविधानाद्वारे समान शिक्षण, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक न्याय यांसारख्या अनेक मूलभूत घटकांना कायदेशीर अधिष्ठान मिळाले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेत बाबासाहेबांनी जगभरात जो नावलौकिक मिळवला, तो आजही समाजासाठी मोठा आदर्श आहे. या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी ‘बार्टी’ आणि सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचशील ध्वजारोहण करण्यात आले, सर्व मान्यवरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व परिसराची पाहणी केली. तसेच माणगाव परिषदेवर आधारित होलोग्राफिक शो पहिला.

२०० कोटींचा विकास आराखडा लवकरच मंजूर होईल: आ. अशोकराव माने
आमदार अशोकराव माने यांनी माणगावच्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन विविध बैठकांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मुंबईला पाठवला असून, राज्य शासनाकडून सुमारे २०० कोटी रुपयांचा हा आराखडा पुढील सहा महिन्यांत मंजूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परिषदेच्या इतिहासाबद्दल बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील बहिष्कृत समाजाला न्याय देण्यासाठी आप्पासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने ही परिषद झाली होती. शाहू महाराजांनी या परिषदेसाठी बाबासाहेबांचे नाव सुचवले आणि ही परिषद समाजाला संघटित करणारी ठरली. १५ ठरावांच्या माध्यमातून बहिष्कृत समाजाला मोठी ताकद मिळाली. ‘शिका आणि संघटित व्हा’ या मंत्राचा पाया याच ठिकाणी रचला गेला. ही केवळ एक परिषद नसून एका क्रांतीची सुरुवात होती.

माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आप्पासाहेब पाटील यांनी दोन महापुरुषांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगातही महापुरुषांचा खरा इतिहास विसरू नका असे आवाहन त्यांनी केले. अनिल कांबळे यांनी माणगाव येथील होलोग्राफीक शो, लंडन हाऊसची प्रतिकृती, परिषदेतील १५ ठरावांचा शिलालेख आणि ‘तक्या’ इमारतीच्या माध्यमातून इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सांगून युवकांनी पुस्तके आणि ग्रंथांची संगत धरावी असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, आप्पासाहेब पाटील यांचे वंशज दिलीप पाटील, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, प्रांताधिकारी दीपक शिंदे, समाज कल्याण सहायक आयुक्त सचिन साळे, शशिकांत कांबळे, अनिल कांबळे यांच्यासह अनेक नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहायक आयुक्त समाज कल्याण (कोल्हापूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी, पुणे), ग्रामपंचायत आणि बौद्ध समाज (माणगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत आणि आभार प्रदर्शन सहायक आयुक्त यांनी केले.

कार्यक्रमानंतर रूपेश निकाळजे (बीड) प्रस्तुत क्रांतीचा साक्षीदार हे एक पात्री नाटक सादर करण्यात आले. तसेच उद्या रविवारी २२ मार्च रोजी सायंकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे व कबीर नाईकनवरे प्रस्तुत प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

००००००




मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

 

फलटण : येथील मुधोजी महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रशासकिय कर्मचारी तसेच प्राध्यापकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेदरम्यान अटीतटीच्या आणि रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रा. डॉ. योगेश माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर विक्की गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
विजेत्यांचे महाविद्यालय प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेमुळे कर्मचारी वर्गामध्ये मध्ये क्रीडाभावना व स्पर्धात्मक वृत्तीला चालना मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.




श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिसंवाद उत्साहात संपन्न


म्हसवड : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथे भाषा (मराठी, हिंदी व इंग्रजी) वाङ्मय विभागाच्या वतीने “साहित्य निर्मिती, आकलनातील संधी आणि आव्हाने : मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा आणि साहित्याचा दृष्टिकोन” या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई-परिसंवाद उत्साहात संपन्न झाला.

        या परिसंवादाचे आयोजन भाषा वाङ्मय विभाग, सिद्धवी फाउंडेशन (तेलंगणा) व महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, महाविद्यालय विकास समितीचे व्हा. चेअरमन मा. ॲड. पृथ्वीराज राजेमाने, ट्रेझरर हेमंत रानडे तसेच प्रशासकीय अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

परिसंवादाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रप्राचार्य डॉ. संजय दीक्षित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच शिवाजी विद्यापीठ गीत गाऊन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी परिसंवाद आयोजित करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले.

परिसंवादास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राणिया लॅम्पू (ग्रीस), डॉ. श्रीनिवास राव, श्री. प्रकाश कोलाराम (अमेरिका), डॉ. डिक्शन ॲडम (घाना), प्रो. जलादी रवी (आंध्र प्रदेश), डॉ. राधा नारायण, डॉ. सोनी शर्मा (बिहार) व डॉ. जगदीश दिनकर शेवते (महाराष्ट्र) यांनी उपस्थिती दर्शविली. विशेष अतिथी म्हणून डॉ. सोलोमन बेन्नी (आंध्र प्रदेश), डॉ. राजू सी.पी. (केरळ) तसेच सिद्धवी फाउंडेशनचे अध्यक्ष नागाबाबू अब्बाराजू सहभागी झाले.

मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विषयातील तज्ज्ञ म्हणून डॉ. सोनी शर्मा, डॉ. राधा नारायण आणि डॉ. जगदीश शेवते यांनी जागतिक स्तरावरील भाषाविषयक विचारांची मांडणी केली. टेक्निकल सेशनची जबाबदारी डॉ. संग्राम शिंदे (हिंदी विभाग), डॉ. सरिता माने (इंग्रजी विभाग) तर मराठी विभागाची जबाबदारी डॉ. मीरा देठे यांनी पार पाडली.

दिवसभर चाललेल्या या परिसंवादात राज्य, देश तसेच परदेशातील प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधकांनी एकूण ४२ शोधनिबंधांचे सादरीकरण केले. तसेच २३० प्रतिनिधींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
या परिसंवादाचे आयोजन इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नितीन भालके, हिंदी विभाग प्रमुख डॉ. रमेश बोबडे व मराठी विभाग प्रमुख डॉ. महेशकुमार सोनावणे यांनी केले होते.

   कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्र. प्राचार्य, आयक्यूएसीचे चेअरमन प्रा. देवेंद्र रणवरे, डॉ. जितेंद्र बनसोडे, प्रा. अंजली माने, बॉटनी विभागप्रमुख डॉ. सुजित जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नितीन भालके यांनी उपस्थित मान्यवर, अतिथी व संशोधकांचे आभार मानले. राष्ट्रगीताने परिसंवादाची सांगता करण्यात आली.




मुधोजी महाविद्यालयात अभिरूप निवडणूक प्रक्रिया उत्साहात संपन्न


फलटण : विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा तसेच मतदानाचे महत्त्व समजावे या उद्देशाने फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागामार्फत “अभिरूप निवडणूक प्रक्रिया (Mock Electoral Process)” हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

   या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कलाशाखा प्रमुख डॉ. ए. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर निवडणूक प्रक्रियेचे आयोजन राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले असून हा उपक्रम प्रा. गिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. त्यांना प्रा. प्रियांका शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमात महाविद्यालयातील विविध विद्या शाखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या अभिरूप निवडणूक प्रक्रियेत एकूण ५३६ विद्यार्थ्यांनी व १०२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी १०.०० वाजता मतदानास सुरुवात करण्यात आली असून ही प्रक्रिया दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरळीतपणे पार पडली. त्यानंतर दुपारी ३.०० वाजता मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.
या निवडणुकीत एकूण ६२६ मते पडली. त्यापैकी १६ मते बाद झाली, तर १३ मते NOTA ला मिळाली. निकालानुसार बी.ए. भाग दोनची विद्यार्थिनी तनुजा कुमकाले हिने २८१ मते मिळवून ११९ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. तर बी.ए. भाग एकचा विद्यार्थी आदित्य रणदिवे याला १५६ मते, तर बी.ए. भाग तीनचा विद्यार्थी विनय शिंदे याला १६२ मते मिळाली.
या निवडणूक प्रक्रियेत धीरज जाधव यांनी केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच शिवाजंली रणदिवे (पहिले मतदान अधिकारी), श्रुतिका कदम (दुसरे मतदान अधिकारी) आणि पायल जाधव (तिसरे मतदान अधिकारी) यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीतील मतदान प्रक्रिया, गुप्त मतदान प्रणाली, मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरला असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




रॅगिंगमुक्त परिसरासाठी श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचा पुढाकार


अँटी-रॅगिंग’ भित्तिपत्रकांचे दिमाखात अनावरण

म्हसवड, दि. १६ (प्रतिनिधी):
रॅगिंग ही केवळ एक वाईट प्रथा नसून विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे. या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथे ‘अग्रणी महाविद्यालय उपक्रम’ व ‘अँटी-रॅगिंग समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने “रॅगिंग जागरूकता : अँटी-रॅगिंग भित्तिपत्रकांचा” अनावरण सोहळा सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) उत्साहात पार पडला.

या भित्तिपत्रकांचे अनावरण मुधोजी कॉलेज, फलटण येथील निवृत्त प्रा. उज्वला पिसाळ-देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

🟡 “रॅगिंगविरुद्ध न घाबरता आवाज उठवा”

          यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. उज्वला पिसाळ-देशमुख म्हणाल्या,

“रॅगिंगसारख्या गैरप्रकारांना बळी न पडता विद्यार्थ्यांनी धैर्याने त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्वरित महाविद्यालयाच्या अँटी-रॅगिंग समितीशी संपर्क साधावा. एकमेकांचा आदर राखणे आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.”

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य अ‍ॅड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने तसेच महिंद्रा ग्रुप नांदी फाउंडेशनच्या ट्रेनर कोमल बनकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. संजय दिक्षित सर होते, तर आयक्यूएसी (IQAC) चेअरमन प्रा. रणवरे सर यांची विशेष उपस्थिती लाभली.

या उपक्रमाचे नियोजन अँटी-रॅगिंग समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. प्रज्ञा माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. समिती सदस्य प्रा. बी. बी. मैद, प्रा. ए. आर. माने मॅडम, प्रा. अ‍ॅड. डॉ. कुलकर्णी मॅडम व प्रा. आर. जे. पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला. भित्तिपत्रकांच्या माध्यमातून रॅगिंगचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत प्रभावी माहिती देण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. ए. आर. माने मॅडम यांनी उपस्थित पाहुणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात शिस्त, सुरक्षितता आणि सौहार्दाचे वातावरण अधिक दृढ होईल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.




संख्याशास्त्र विषयातील “Minor V: Association and Correlation Analysis” हे नवे पाठ्यपुस्तक प्रकाशित

संख्याशास्त्र विषयातील “Minor V: Association and Correlation Analysis” हे नवे पाठ्यपुस्तक प्रकाशित
संख्याशास्त्र विषयातील “Minor V: Association and Correlation Analysis” हे नवे पाठ्यपुस्तक प्रकाशित

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण–2020 (NEP–2020 2.0) अंतर्गत सुधारित अभ्यासक्रमानुसार बी.एस्सी. भाग दोन, सत्र तीन (संख्याशास्त्र) या वर्गासाठी “Minor V: Association and Correlation Analysis” हे पाठ्यपुस्तक ज्योतीचंद्र पब्लिकेशन, लातूर यांच्याकडून प्रकाशित करण्यात आले आहे.
सदर पुस्तकामध्ये अभ्यासक्रमातील संकल्पनांची शास्त्रीय, सुलभ व अभ्यासक्रमाभिमुख मांडणी करण्यात आली असून, संकल्पनांची स्पष्टता, सोपी व समर्पक उदाहरणे तसेच परीक्षाभिमुख दृष्टिकोन यामुळे विद्यार्थ्यांचे संकल्पनात्मक आकलन दृढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पदवीस्तरावरील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या पुस्तकाचे लेखन
प्रा. हर्षवर्धन श्रीकांत कुलकर्णी (फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड),
प्रा. राकेश हरिचंद्र वाघ (एस.पी.डी.एम. आर्ट्स, एस.बी.बी. अँड एस.एच.डी. कॉमर्स व एस.एम.ए. सायन्स कॉलेज, शिरपूर, जि. धुळे),
प्रा. ज्ञानेश्वर एकनाथ नरवडे (देओगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, छत्रपती संभाजीनगर)
आणि
प्रा. प्रियांका श्रीकांत कुलकर्णी (नूतन मराठी विद्यालय प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, पुणे)
यांनी संयुक्तरित्या केले आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन प.पू. गोविंद महाराज उपळेकर मंदिर संस्थांचे विश्वस्त समितीचे सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब) यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी मंदिर विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री. अरविंद रानडे उपस्थित होते.
         या प्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, खजिनदार मा. हेमंत रानडे, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य ॲड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, तसेच श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दीक्षित यांनी लेखकांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.