वनमहोत्सवानिमित्त महाविद्यालय परिसर व मौजे भाटकी येथे वृक्षारोपण

वनमहोत्सवानिमित्त महाविद्यालय परिसर व मौजे भाटकी येथे वृक्षारोपण

महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करताना महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ. विकास काकडे व प्राध्यापक – प्राध्यापिका

म्हसवड, प्रतिनिधी : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘वन महोत्सव’ निमित्त १ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत महाविद्यालय परिसर तसेच दत्तक गाव मौजे भाटकी येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

मौजे भाटकी येथे वृक्षारोपण करताना पोलीस पाटील मा. सौ. हर्षदा शिर्के, मा.सौ. ज्योती शिर्के व प्राध्यापक -प्राध्यापिका
– ~~~~~~~~~~~~~~

वनमहोत्सव सप्ताहांतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महाविद्यालय परिसर व मौजे भाटकी येथे विविध भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे, वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि हरित परिसर निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.


या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास काकडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. वाय. वाय. दुबाले, प्रा. ए. एम. लांब, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. एम. मोरे, प्रा. के. सी. वाघमारे तसेच सदस्या डॉ. पी. ए. माने यांनी विशेष परिश्रम घेतले.


यावेळी  पोलीस पाटील मा. सौ. हर्षदा शिर्के, मा.सौ. ज्योती शिर्के व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली.




कर्तृत्ववान प्रशासक आर. वाय. गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कर्तृत्ववान प्रशासक आर. वाय. गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


फलटण एज्युकेशन सोसायटीचे, मुधोजी महाविद्यालयात सत्कार; कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव


              फलटण (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेमध्ये तब्बल ३५ वर्षे प्रामाणिक, निष्ठावान व कार्यक्षम सेवा बजावून प्रशासकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे तथा सध्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात  रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असलेले आदरणीय आर. वाय. गायकवाड यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

         

 

 

 

      ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय स्थान निर्माण करणारे आर. वाय. गायकवाड यांनी आपल्या सेवाकाळात शिस्त, प्रामाणिकपणा, कार्यक्षमता आणि सेवाभाव यांचा आदर्श ठेवला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.

                    सध्या मुधोजी महाविद्यालयात  रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावाने, प्रेमळ व विश्वासपूर्ण संवादशैलीने सर्व कर्मचारी, विद्यार्थी व सहकाऱ्यांची मने जिंकली आहेत. त्यांचे प्रभावी वक्तृत्व, सकारात्मक दृष्टीकोन आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कार्यपद्धती यामुळे ते महाविद्यालयात विशेष लोकप्रिय आहेत.

         वाढदिवसानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत आदरणीय संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते आर. वाय. गायकवाड यांचा शाल, पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रदीर्घ सेवेला गौरवाची मानवंदना अर्पण केली.


         त्यानंतर मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व निरंतर सेवाकार्याच्या शुभेच्छा दिल्या.

              यावेळी धनंजयराव गाडगीळ कॉलेज होस्टेलच्या समस्त मित्रमंडळींकडूनही गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. संघर्षातून घडलेले त्यांचे कर्तृत्व, यशाच्या शिखरावर पोहोचूनही जपलेला साधेपणा, मित्रांप्रती असलेली आत्मीयता आणि माणुसकीची जपणूक हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख असल्याची भावना मित्रपरिवाराने व्यक्त केली.

                    कर्तृत्व, प्रामाणिकपणा, शिस्त, सेवाभाव आणि माणुसकी यांचा सुंदर संगम असलेले आर. वाय. गायकवाड यांचे व्यक्तिमत्त्व आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या अनुभवाचा प्रकाश समाजाला आणि शैक्षणिक क्षेत्राला पुढील काळातही दिशा देत राहो, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

 

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




विश्वासाच्या दरीत कोसळलेले स्वप्न

लोहगडाची ती धुक्याने वेढलेली सकाळ. निसर्गाच्या कुशीत विसावलेला तो अभेद्य किल्ला, जो शतकानुशतके अनेक युद्धांचा आणि पराक्रमांचा साक्षीदार राहिला आहे. त्याच्या दगडी तटबंदीने अनेक वादळे झेलली, पण त्या दिवशी या तटबंदीने जो विश्वासघात पाहिला, तो काळ्या दगडांनाही पाझर फोडणारा होता. ती खोल दरी, जिच्याकडे पाहताना डोळे फिरतात, ती दरी त्या दिवशी फक्त एका माणसाला गिळंकृत करत नव्हती, तर ती एका संपूर्ण कुटुंबाची स्वप्ने, एक निष्पाप विश्वास आणि आपल्या समाजातील उरलीसुरली माणुसकीच स्वतःच्या अंधारात ओढत होती.

–    @ राहूल हरीभाऊ इंगळे पाटील

मोबाईल – 9890577128

दि. २४ जुन २०२६

 

लोहगडाच्या दरीत कोसळलेला विश्वास…!
एका विश्वासघाताची, एका कुटुंबाच्या उद्ध्वस्त स्वप्नांची आणि माणुसकीच्या पराभवाची वेदनादायी कहाणी

लेखक : राहुल हरीभाऊ इंगळे पाटील
मोबाईल : ९८९०५७७१२८
दिनांक : २४ जून २०२६

लोहगडाची ती धुक्याने वेढलेली सकाळ… सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभा असलेला हा अभेद्य किल्ला जणू इतिहासाची पानेच आपल्या दगडी तटबंदीवर कोरून उभा आहे. छत्रपतींच्या स्वराज्याच्या संघर्षाचा, शौर्याचा आणि बलिदानाचा साक्षीदार असलेला हा दुर्ग आजही हजारो पर्यटकांना आकर्षित करतो. त्याच्या माथ्यावरून दिसणारे निसर्गसौंदर्य मन मोहून टाकते; परंतु त्या सौंदर्यामागे कधी कधी अशा शोकांतिका दडलेल्या असतात, ज्या काळजाचा ठाव घेतात.
त्या दिवशी लोहगडाच्या तटबंदीने तलवारींची खणखण ऐकली नाही, तोफांचे आवाज ऐकले नाहीत आणि कोणतेही युद्ध पाहिले नाही. मात्र, त्याने पाहिला तो विश्वासाचा खून. अशा विश्वासघाताचा साक्षीदार तो झाला, ज्याने एका व्यक्तीचेच नव्हे तर एका संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त केले.
त्या खोल दरीने त्या दिवशी केवळ एका व्यक्तीचा जीव घेतला नाही; तिने एका आईच्या डोळ्यातील आशा हिरावून घेतल्या, वडिलांच्या खांद्यावरील आधार काढून घेतला, पत्नीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, मुलांच्या भविष्याची स्वप्ने चिरडून टाकली आणि नातेवाईकांच्या मनात आयुष्यभर न भरून येणारी जखम करून ठेवली.
विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. जेव्हा त्याच विश्वासाचा विश्वासघात होतो, तेव्हा त्याचे परिणाम मृत्यूपेक्षाही भयावह असतात. तलवारीचे घाव भरून निघतात, जखमा काळानुसार भरतात; पण विश्वासघाताने झालेली जखम आयुष्यभर ठसठसत राहते.
लोहगडाचा इतिहास शौर्याचा आहे, पण या घटनेने त्याच्या इतिहासात वेदनेचे एक काळे पान जोडले. हजारो पर्यटक दररोज त्या दरीकडे पाहून निसर्गाच्या सौंदर्याचे कौतुक करतात; परंतु त्या दरीने एका कुटुंबाच्या किंकाळ्या, आक्रोश आणि उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याचे मौनही आपल्या गर्भात कायमचे जपून ठेवले आहे.
आज समाजाने स्वतःलाच एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे—आपण खरोखरच आधुनिक झालो आहोत का? की माणुसकी, विश्वास आणि नात्यांचे मूल्य हरवत चाललो आहोत? तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मनांतील अंतर वाढले. शिक्षण वाढले, पण संवेदनशीलता कमी झाली. पैसा वाढला, पण विश्वासाची किंमत घसरली.
लोहगडाची तटबंदी आजही अभिमानाने उभी आहे. धुके आजही त्याला कवेत घेते. दऱ्या आजही तितक्याच खोल आहेत. मात्र, त्या दगडांनी पाहिलेला तो विश्वासघात इतिहासाच्या पानांवर नव्हे, तर असंख्य संवेदनशील मनांवर कायमचा कोरला गेला आहे.
ही घटना केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची नाही; ती आपल्या समाजातील नात्यांची, विश्वासाची आणि माणुसकीची कसोटी आहे. अशा प्रत्येक घटनेतून समाजाने शिकले पाहिजे, सत्य समोर आले पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे. कारण अन्यायावर मौन म्हणजे अन्यायाला मूक संमती होय.
लोहगडाच्या दरीत हरवलेला तो जीव कदाचित परत येणार नाही; पण त्याच्या मृत्यूतून समाजाला जाग आली, तर तेच त्या वेदनादायी घटनेचे खरे स्मारक ठरेल.




दानात श्रेष्ठ दान – नेत्रदान : डॉ. महेशकुमार सोनावणे

दानात श्रेष्ठ दान – नेत्रदान : डॉ. महेशकुमार सोनावणे


म्हसवड, दि. १५ (झुंजार भारत प्रतिनिधी) – अन्नदान, रक्तदान, भूमिदान यांसारखी अनेक समाजोपयोगी दाने समाजात होत असली तरी नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. दृष्टी नसल्यास विश्वातील सौंदर्याचा अनुभव घेता येत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची संकल्पना समाजात अधिकाधिक रुजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख व ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. महेशकुमार सोनावणे यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १० व ११ जून रोजी आयोजित नेत्रदान दिन व नेत्रदान जनजागृती अभियान शिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.


या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कुलकर्णी व डॉ. सुप्रिया विरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी नेत्रचिकित्सक अधिकारी कु. प्रज्ञा क्षीरसागर यांनी उपस्थितांना नेत्रदानाचे महत्त्व, नेत्रदान दिनाची पार्श्वभूमी तसेच मरणोत्तर नेत्रदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमांतर्गत आयोजित नेत्रतपासणी शिबिरात विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास काकडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश दुबाले, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल लांब तसेच प्रा. करण वाघमारे, प्रा. प्रवीण मोरे, प्रा. राजेंद्र पवार, प्रा. डॉ. प्रज्ञा माने आणि प्रा. अंजली माने यांनी विशेष सहकार्य केले.


शिबिरास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


■ नेत्रदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




माजरवाडी गाव ठरणार पर्यावरण संवर्धनाचा आदर्श मॉडेल

निसर्ग संवर्धनाचा ऐतिहासिक संकल्प : माजरवाडी गावात 50 ते 500 वर्षांच्या हेरिटेज वृक्षसंवर्धन उपक्रमाचा शुभारंभ


नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) : प्रतिनिधी :

           निसर्ग संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीची शाश्वत जपणूक करण्याच्या उद्देशाने नारायणगाव परिसरातील माजरवाडी गावात एक महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 50, 150, 250 आणि 500 वर्षांपर्यंत टिकणाऱ्या हेरिटेज वृक्षसंवर्धनाच्या संकल्पनेचा हा अभिनव प्रकल्प महाराष्ट्रासह देशासाठी आदर्श ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


हा उपक्रम सुशिलादेवी सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक श्री. संतोष जाधव यांच्या संकल्पनेतून साकार होत असून ग्रामपंचायत मंडळ व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

भौगोलिक परिस्थिती, पर्यावरणीय गरजा आणि नैसर्गिक संसाधनांच्या दीर्घकालीन जतनाचा विचार करून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. निसर्गशक्तीचा आदर्श घेत विकसित भारत, आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शेती आणि पर्यावरणपूरक विकास यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे भविष्यात खारूताई, फुलपाखरे, मधमाश्या, चिमण्या, मुंगूस, कावळे तसेच विविध पशू-पक्ष्यांना सुरक्षित अधिवास उपलब्ध होणार आहे. जैवविविधतेच्या संवर्धनासोबतच स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होणार आहे.
माजरवाडी गावाने घेतलेला हा संकल्प राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक गाव व शहरामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती संरक्षक साखळी निर्माण होऊन पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभी राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

निसर्गसंवर्धन, शाश्वत विकास आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी उचललेले हे पाऊल इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल, असा विश्वास ग्रामस्थ आणि आयोजकांनी व्यक्त केला.

संपर्क : श्री. संतोष जाधव सुशिलादेवी सोशल वेल्फेअर फाउंडेशन मो. 9004438668




‘आदरणीय विलासरावजी देशमुख’ नावाचे एक अथांग पर्व

‘आदरणीय विलासरावजी देशमुख’ नावाचे एक अथांग पर्व. : विशेष लेख 

   “माणसं संतप्त होणारच, कारण त्यांची सुखं-दुःखं तीव्र असतात. आपण फक्त त्यांचं ऐकून घ्यायचं असतं आणि त्यांचे हात धरून त्यांना संकटातून बाहेर काढायचं असतं…” अस पक्षाला आणि प्रशासनाला सांगणारा लोकनेता म्हणजे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख होय, आज त्यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन.

पुण्यातील अलका टॉकीजच्या चौकातून गरवारे कॉलेजकडे जाणाऱ्या एखाद्या तरुणाच्या डोळ्यांत जे स्वप्न असतं, तेच स्वप्न बाभळगावच्या मातीतून आलेल्या एका राजबिंड्या तरुणाच्या डोळ्यांत होतं. आदरणीय विलासरावजी… नावाप्रमाणेच ज्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात एक अथांग विलास होता; सुसंस्कृततेचा, वक्तृत्वाचा, आणि माणसांवर अतोनात प्रेम करण्याचा!

सार्वजनिक जीवनात असे काही मोजकेच चेहरे होऊन गेले, ज्यांच्या केवळ आठवणीनेही चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांत कृतज्ञतेचे पाणी एकत्र येते. आदरणीय विलासराव देशमुख हे असंच एक ‘उमदं’ रसायन होतं. आज २०२६ च्या रखरखत्या उन्हात, जेव्हा मराठवाड्याची माती तापलेलेली आहे, शेतकरी, कामगार, कष्टकरी अडचणीत आहे, लातूरच वलय डांगाळत आहे, तेव्हा लातूरच्या वेशीवर उभं राहिल्यावर एका माणसाची उणीव काळजाला चटका लावून जाते. ते असते तर? कदाचित संकटाच्या या गडद छायेतही त्याच्या चेहऱ्यावरचं ते आश्वासक हसू पाहून आशेचे पाझर फुटले असते.

आदरणीय विलासरावजी नावाच्या महावृक्षाची पाळंमुळं बाभळगावच्या काळ्या आईत रुजलेली होती. पूर्वजांचा विचारी, सेवेचा वारसा आणि घरातलं पुरोगामी वातावरण, यांमुळे जनसेवेचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. पण या सुप्त गुणांना खऱ्या अर्थाने पैलू पाडले ते पुण्याच्या विधी महाविद्यालयाने आणि गरवारे कॉलेजच्या प्रांगणाने. पुण्याच्या सांस्कृतिक आणि वैचारिक हवेत हा तरुण अधिकच उजळून निघाला.

आदरणीय विलासरावजी कायद्याची पदवी घेऊन जेव्हा लातूरच्या न्यायालयात वकिली करू लागले, तेव्हा न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करण्यापेक्षा त्यांना कोर्टाबाहेरच्या माणसांची दुःखं जास्त ऐकू येत होती. लातूरच्या दुष्काळ निवारण समितीचे सचिव म्हणून काम करताना, दुष्काळी गावांमध्ये पायी फिरून धान्य वाटप करताना या तरुण वकिलांना समजलं की, खरं न्यायालय तर बाहेर आहे आणि तिथे न्यायाची नितांत गरज आहे. मग सुरू झाला . बाभळगावचे ‘सरपंच’ ते राज्याचा ‘शिल्पकार’! आणि देशपातळीवर लातूरचे यशस्वी नेतृत्व असा प्रवास.

सन १९८० ची ती निवडणूक… लातूरच्या राजकारणात एका देखण्या, सुशिक्षित तरुणाने पाऊल ठेवलं आणि विधानसभेची पहिली स्वारी फत्ते केली. त्यानंतर मंत्रिपदाची तालीम सुरू झाली. पहील्यादा आमदार झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत, म्हणजेच १९८२ मध्ये ते गृहराज्यमंत्री झाले. त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयाची इमारत, पोलीस वसाहत आणि शहरात तीन नवी पोलीस ठाणी उभी केली. परिवहन मंत्री म्हणून ‘गाव तिथे एसटी बस’ पोहोचवली, १९८५ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री झाले. महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम, परिवहन आणि संसदीय कामकाज यांसारख्या अष्टपैलू खात्यांचा कारभार सांभाळताना आपली मांड पककी केली. आदरणीय विलासरावांचा कारभारी म्हणून हात मऊ पण पकड घट्ट होती. मांजरा कारखान्याच्या रूपाने त्यांनी सहकाराची पहिली साखरपेरणी केली आणि लातूरचे भाग्य बदलू लागले.

पण नियतीला नेहमीच सरळ रेषा आवडत नाही. सन १९९५ च्या निवडणुकीत विलासरावांना पराभवाचा धक्का बसला. कोणताही सामान्य नेता खचून गेला असता. पण आदरणीय विलासरावजी ‘फिनिक्स’ होते. त्या चार वर्षांच्या काळात त्यांनी कुणावर टीका केली नाही, द्वेष बाळगला नाही. ते पुन्हा लोकांमध्ये गेले, त्यांची गाऱ्हाणी ऐकली. तळापासून सावरून पुन्हा उभं राहण्याची त्यांची ती ऊर्मी अचंबित करणारी होती. परिणामी, १९९९ मध्ये त्यांनी अशी काही झेप घेतली की थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावरच जाऊन विराजमान झाले.

सत्ता चालवतांना ८ पक्षांची आघाडी सांभाळत सरकार चालवणं म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं. पण विलासरावांकडे कमालीचा संयम आणि विलोभनीय संवादकौशल्याची जादू होती. राष्ट्रवादी काँग्रेस असो वा इतर मित्रपक्ष, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे ते ‘कॅप्टन’ होते. हा सत्तेचा काळ समन्वयाचा सुवर्णकाळ आणि बळीराजाचा आधार ठरला.

पूढे मुख्यमंत्री होताच त्यांनी पहिला शब्द टाकला, “माझा बळीराजा अडचणीत आहे, त्याची वीज कापली जाता कामा नये.” त्यांच्याच काळात तब्बल ४५ लाख शेतकऱ्यांची साडेआठ हजार कोटींची कर्जमाफी झाली. माहितीचा अधिकार (RTI) देणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. मुंबईचा कायापालट करताना मोनोरेल आणली, मिठी नदीचा प्रश्न सोडवला आणि गुटखाबंदीचा धाडसी निर्णय घेतला. आदरणीय विलासरावजी हे ‘विश्वासार्हतेचे’ प्रतीक होते. वादळ आल तरी आपली नौका योग्य दिशेने आणि वेगाने चालवून, सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचं सामर्थ्य आदरणीय विलासरावजी नावाच्या सुकाणूमध्ये होत.

आदरणीय विलासराव नुसतेच नेते नव्हते, ते रसिक होते, ‘व्यक्ती आणि वल्ली’ होते. त्यांच्या भाषणात जेवढी धार असायची, तेवढीच मिश्किलता त्यांच्या स्वभावात होती. विधिमंडळात त्यांच्या हजरजबाबी टिपण्यांनी विरोधकांचेही चेहरे हसून खुलायचे. यामुळे त्यांची आजही राजकारणापलीकडचा एक ‘उमदा’ नेता अशीच छाप आहे.

त्यांना संगीताची अफाट जाण होती. सुरेश भटांच्या गझला त्यांना तोंडपाठ असायच्या. चित्रपट आणि नाटकांप्रमाणेच त्यांनी महाराष्ट्राच्या लावणी आणि तमाशा कलावंतांनाही मानधन वाढवून सन्मान दिला. विद्यापीठांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांचे नाव देताना त्यांच्यातील सांस्कृतिक जाणिवा स्पष्ट दिसायच्या. ‘वर्षा’ बंगल्यावर येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याला आदराने भेटणारे, वैशालीताईंच्या साथीने आपल्या मुलांना उत्तम संस्कार देणारे ते कुटुंबवत्सल ‘अण्णा’ होते.

आज विलासरावांची आठवण दाटून येते. राजकारणात विचारधारेचा गोंधळ उडाला आहे, समाजमन दुभंगल आहे, अशा वेळी सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा तो दिलदार आणि हसतमुख चेहरा आज आपल्यात नाही, ही जाणीव राज्याला अधिकच विकल करते.

          पण विलासरावांचे विचार संपलेले नाहीत. त्यांनी शिकवलं की, संकट कितीही मोठं असो, लोकसहभागातून त्यावर मात करता येते. आज आदरणीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त केवळ त्यांचे स्मरण करणे पुरेसे नाही, तर त्यांनी जपलेला ‘विश्वास’, त्यांनी दाखवलेला ‘विकास’ आणि त्यांची ‘विचारनिष्ठा’ हाच आपला पुढचा मार्ग असला पाहिजे.

अशा आफाट स्मरणशक्तीच्या, प्रसन्न, कनवाळू आणि शब्दाला जागणाऱ्या लोकनेत्याला, महाराष्ट्राच्या या राजबिंड्या पुत्राला मानाचा मुजरा!

लेखक :  राहुल हरिभाऊ इंगळे पाटील
मो. ९८९०५७७१२८
दि. २६ मे २०२६




मोहिते वडगांव येथे मृदा परीक्षणासाठी माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

मोहिते वडगांव येथे मृदा परीक्षणासाठी माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

       मोहिते वडगांव, ता. कडेगाव, जि. सांगली (दि. २० मे २०२६) : जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय, रेठरे बु. येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत मोहिते वडगांव येथे मृदा परीक्षणासाठी माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांमध्ये मृदा परीक्षणाबाबत जनजागृती केली.


हा उपक्रम बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी श्री. हणमंतराव (आप्पा) मोहिते यांच्या शेतात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमामध्ये कृषिदूत मयूर, अनुज, विघ्नहर, कुणाल, सुशांत, तुषार, प्रविण व रणजित यांनी शेतातील विविध ठिकाणांहून योग्य पद्धतीने मातीचे नमुने कसे घ्यावेत याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच माती नमुना संकलनासाठी लागणारी साधने, नमुना घेताना घ्यावयाची काळजी आणि नमुने प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मृदा परीक्षणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, सामू (pH), सेंद्रिय कर्ब तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती समजण्यास मदत होते, अशी माहिती दिली. मृदा परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन करता येत असल्याने उत्पादन खर्चात बचत होऊन पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास श्री. जयवंत मोहिते, सौ. भाग्यश्री मोहिते, सौ. शिलावती मोहिते, श्री. दत्तात्रय मोहिते, श्री. ब्रह्मदेव सरक, श्री. महादेव मिसाळ, श्री. वसंत काळे, श्री. सदाशिव कुंभार, श्री. पांडुरंग मिसाळ आणि श्री. रामचंद्र मिसाळ आदी शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करत भविष्यात नियमितपणे मृदा परीक्षण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी विद्यार्थ्यांनी शास्त्राधारित शेती तंत्रज्ञान गावपातळीपर्यंत पोहोचवून शेतकरी व विद्यार्थी यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये मृदा परीक्षणाबाबत जागरूकता निर्माण होऊन शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले.




🌿 नात्यांचे तीन मुखवटे 🌿 जगण्याची आणि जपण्याची कला

  1. नात्यांचे तीन मुखवटे: ललित लेख 

जगण्याची आणि जपण्याची कला

नात्यांची वीण टिकवण्यासाठी कधी डोळस अंधत्व, कधी सहनशील बहिरेपणा आणि कधी संयमी मौन स्वीकारावं लागतं. समोरच्याच्या उणिवांकडे दुर्लक्ष, कटू शब्दांना माफ करणं आणि योग्य वेळी शांत राहणं हीच नाती जपण्याची खरी कला आहे. प्रेमासाठी केलेला हा अदृश्य अभिनयच नात्यांना दीर्घायुष्य देतो.

नजरेवरती पडदा टाकू, उणिवांचा हा नजारा,

चूक तुझी ही भासे मजला, देखणा तुझा नखरा।

डोळस सोडून अंधार स्वीकारू, प्रेमाच्या या रीतीने,

संसाराची वीण सांधू, समजूतदार हसण्याने॥ 

जगण्याची आणि जपण्याची कला

नात्यांची वीण टिकवण्यासाठी कधी डोळस अंधत्व, कधी सहनशील बहिरेपणा आणि कधी संयमी मौन स्वीकारावं लागतं. समोरच्याच्या उणिवांकडे दुर्लक्ष, कटू शब्दांना माफ करणं आणि योग्य वेळी शांत राहणं हीच नाती जपण्याची खरी कला आहे. प्रेमासाठी केलेला हा अदृश्य अभिनयच नात्यांना दीर्घायुष्य देतो.

नजरेवरती पडदा टाकू, उणिवांचा हा नजारा,

चूक तुझी ही भासे मजला, देखणा तुझा नखरा।

डोळस सोडून अंधार स्वीकारू, प्रेमाच्या या रीतीने,

संसाराची वीण सांधू, समजूतदार हसण्याने॥ १ ॥

तिखट बोलांची धार येता, कानांवरती आवरणे,

भाषण तुझे गाणे वाटे, लयीत तुजला सावरणे।

क्षमेचा हा कवच पांघरू, गर्वाची ही सोडून ढाल,

शांततेच्या वाऱ्याने मग, नात्याची ही राहे खुशाल॥ २ ॥

शब्दांची ही शस्त्रे आवरू, ओठांवरती शांतता,

मौनदीप हा मनात लावू, संपवून ही कटुता।

कसरत ही अभिनयाची, प्रेमासाठी केले

नात्यांची ही वेल सदा, शब्दावाचून बहरलेली॥ ३ ॥

मानवी आयुष्य म्हणजे नात्यांचा एक सुंदर पण नाजूक कोलाज. ही नाती कधी रेशमी धाग्यासारखी मऊ असतात, तर कधी काचेसारखी संवेदनशील. नात्यांचं हे विणकाम टिकवून ठेवणं ही एक मोठी जीवनकला आहे. ही जीवनकला साध्य करण्यासाठी आपल्या मुद्रेवर तीन मुखवटे परीधान करावे लागतील. हे मुखवटे म्हणजेच आंधळा, बहिरा आणि मुका होता आले पाहीजे. हा केवळ सुवीचार किंवा केवळ उपदेश नसून नातेसंबंधांच्या मंदिरातील ‘मौनदीप’ आहेत. नाती टिकवण्यासाठी एकाच व्यक्तीला अनेकदा हे तीन मुखवटे एकाच वेळी परिधान करावे लागतात. ही कला ज्याला जमली तो खरी नाती जपू आणि वाढवू शकतो.

अर्थात आपल्या नात्यात पहिला मुखवटा येतो तो म्हणजे ‘आंधळेपणा’. याचा अर्थ असा नाही की, धृतराष्ट्र सारख अंधत्व स्विकारायच तर डोळस अंधत्व असल पाहीजे. आपल्याला समोरच्याच्या चुका दिसत असतात, पण, कधी कधी डोळे असूनही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, म्हणजेच प्रेमाची पट्टी डोळ्यावर बांधणं गरजेचं असतं. समोरच्याच्या उणिवांकडे काणाडोळा करून त्याच्यातील चांगुलपणा शोधणं, हा आंधळेपणा अगतिकतेचा नसून तो समजूतदारपणाचा असतो. सर्व काही पाहणारी नजर नाती वाचवू शकत नाही; कधी कधी मुद्दाम मिटलेले डोळेच घर आणि मनं टिकवतात.

दुसरा मुखवटा आहे ‘बहिरेपणा’. नात्यांच्या प्रवासात कधी कधी कटू शब्दांचे बाण सुटतात, टीकांचे वादळ येते. अशा वेळी अहंकाराला बाजूला सारून ‘क्षमेची शाल’ पांघरून बहिरे व्हावे लागते. टोचणारे शब्द जर मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवले, तर नात्याचा ओलावा आटायला वेळ लागत नाही. ऐकूनही न ऐकल्यासारखं करणं ही सहनशीलतेची सर्वोच्च पायरी आहे. यामुळे नात्यातील संवाद जरी थांबला, तरी विसंवाद टाळता येतो.

तिसरा आणि अत्यंत कठीण मुखवटा म्हणजे ‘मुके होणं’. जेव्हा अंतर्मनात शब्दांची धार तीव्र असते, उत्तर देण्याची पूर्ण क्षमता असते, तेव्हा ओठांवर ‘मौनाचा दीप’ लावणं हेच संयमाचं लक्षण आहे. मौन म्हणजे केवळ शांत बसणे नव्हे, तर नात्यांवर चढवलेलं ते एक सुगंधी चंदन आहे. शब्दांनी झालेली जखम भरून येत नाही, पण योग्य वेळी धरलेलं मौन नात्याचं तुटणारं घर पुन्हा सांधू शकतं.

एकाच माणसाला हे तीन चेहरे सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. हे मुखवटे म्हणजे ढोंगीपणा नसून तो एक ‘अदृश्य अभिनय’ आहे, जो केवळ प्रेमापोटी केला जातो. नात्यातलं घर हे विटा-मातीपेक्षा शब्दांच्या संयमावर आणि शांततेवर उभं असतं. शेवटी, नाती शब्दांनी नाही, तर अनेकदा न बोललेल्या मौनानेच अधिक काळ टिकतात आणि बहरतात. या तीन अवस्थांतूनच नात्यांचं नाजूक विणकाम अखंड आणि अभेद्य राहते. तर मग असे मुखवटे घालून तर पहा ……

राहूल हरिभाऊ इंगळे-पाटील

रा.करकट्टा ता.जि.लातूर

मोबाईल ९८९०५७७१२८     




मुधोजी महाविद्यालयात नवनाथ येवले यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

मुधोजी महाविद्यालयात नवनाथ येवले यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

फलटण : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील वरिष्ठ लिपिक श्री. नवनाथ नारायण येवले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला गौरव सोहळा उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम होते. प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब येवले, उपप्राचार्य प्रा. सौ. उर्मिला भोसले, रजिस्ट्रार श्री. आर. वाय. गायकवाड, बारामतीचे नगरसेवक गोरख पारसे, पत्रकार अनिल सावळे पाटील तसेच सत्कारमूर्ती श्री. नवनाथ येवले उपस्थित होते.


यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, “संस्थेचे कर्मचारी सेवानिवृत्त झाले तरी ते फक्त महाविद्यालयातील सेवेतून मुक्त होतात; मात्र संस्थेच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून ते शेवटपर्यंत आमच्यासोबत राहतात.” तसेच त्यांनी येवले कुटुंब प्रतिष्ठित असून ते एकनिष्ठ व कर्तव्यदक्ष असल्याचे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नवनाथ येवले हे संस्थेवर अपार निष्ठा असलेले व्यक्तिमत्व असून त्यांनी आपल्या कुटुंबाला उत्तम संस्कार देत मुलांना उच्च शिक्षण दिले आहे, ही बाब प्रेरणादायी आहे.

यावेळी बाळासाहेब येवले, अनिल सावळे पाटील, डॉ. ए. एन. शिंदे आणि फातिमा तांबोळी यांनी मनोगत व्यक्त करून येवले यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजिस्ट्रार श्री. आर. वाय. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सागर निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. राजू भोसले यांनी मानले.

या सोहळ्यास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. श्री. नवनाथ येवले यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करत महाविद्यालयाच्या कार्यात मोलाचे योगदान दिल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




मुधोजी महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक नवनाथ येवले यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा …

       

फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील वरिष्ठ लिपिक श्री. नवनाथ नारायण येवले हे दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सन्मानार्थ सेवानिवृत्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा समारंभ गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे होणार आहे. तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे प्रमुख शुभहस्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा. प.स. सदस्य श्री. बाळासाहेब नारायण येवले व मा. सरपंच, मुंजवडी यांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. पंडितनाथ हरिभाऊ कदम यांचे मार्गदर्शन लाभणार असून, या प्रसंगी सहकारी, मित्रपरिवार व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री. नवनाथ येवले यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने काम करत महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निवृत्तीमुळे एक अनुभवी व समर्पित कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

 

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)