आत्मनिर्भर भारत निर्माण होणं काळाची गरज…✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

 

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

आजच्या जागतिक परिस्थितीकडे पाहिले असता, राष्ट्रांमधील वाढती स्पर्धा, वर्चस्वाची लढाई आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवण्याची प्रवृत्ती यामुळे युद्धसदृश्य परिस्थिती वारंवार निर्माण होताना दिसते. इतिहासात झालेले पहिले व दुसरे महायुद्ध हे केवळ घटनाच नव्हत्या, तर संपूर्ण मानवजातीला हादरवून टाकणारे अनुभव होते. लाखो लोकांचा मृत्यू, प्रचंड विध्वंस आणि असंख्य कुटुंबांचे उद्ध्वस्त आयुष्य — या सर्वांनी जगाला मोठा धडा दिला; परंतु दुर्दैवाने त्या धड्याचा पुरेसा उपयोग झालेला दिसत नाही.

युद्धाच्या कथा कदाचित ऐकायला रोमांचक वाटू शकतात, पण वास्तवात त्या वेदनादायी असतात. युद्ध सुरू असताना सामान्य माणसाला ज्या यातना सहन कराव्या लागतात, त्या शब्दांत मांडणे कठीण आहे. आपल्या डोळ्यासमोर होणारा विनाश, आप्तस्वकीयांचा मृत्यू आणि असहाय्यता — या सर्व गोष्टी मनाला हेलावून टाकतात.

आजही जगात साम्राज्यवादी विचारसरणी, नैसर्गिक साधनसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्याची स्पर्धा आणि आर्थिक वर्चस्वाच्या हव्यासामुळे संघर्ष निर्माण होतो. काही मोजक्या शक्तिशाली व्यक्ती किंवा राष्ट्रांच्या महत्त्वाकांक्षेमुळे संपूर्ण मानवजातीला त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कडक नियमावली तयार करून तिचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
जगातील विविध देशांमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे एक देश दुसऱ्यावर अवलंबून राहतो. हे परस्परावलंबित्व जर संतुलित नसेल, तर ते संघर्षाचे कारण बनते. आजच्या काळात पेट्रोल, गॅस आणि इतर ऊर्जास्रोतांसाठी परदेशांवर अवलंबून राहण्याचे परिणाम आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. पुरवठा खंडित झाला की सामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो — हॉटेल व्यवसाय बंद पडणे, इंधनासाठी रांगा, दैनंदिन जीवन विस्कळीत होणे याची उदाहरणे आपण पाहिली आहेत.

यावर एकमेव उपाय म्हणजे स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भरता. प्रत्येक राष्ट्राने आपल्या उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तंत्रज्ञान, उद्योग, शेती आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये स्वतःची क्षमता विकसित करणे ही काळाची गरज आहे.

भारताच्या संदर्भात पाहिले तर “आत्मनिर्भर भारत” ही संकल्पना केवळ आर्थिक धोरण नाही, तर एक व्यापक राष्ट्रीय दृष्टीकोन आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, आयात कमी करणे, संशोधन आणि नवकल्पनांना चालना देणे, तसेच प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवणे — या सर्व गोष्टी या संकल्पनेचा भाग आहेत.
आपण महासत्ता होण्याचा केवळ नारा देण्यापेक्षा, देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, सुरक्षित आणि सक्षम जीवन जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी, स्वयंपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण झाली, तरच खऱ्या अर्थाने राष्ट्र मजबूत होईल.

आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी सरकारसोबतच प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, लोकसंख्या आणि मागणी — या पाच घटकांवर आधारित विकासाचा पाया अधिक मजबूत करणे गरजेचे आहे.
भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित, समृद्ध आणि सशक्त भारत घडवायचा असेल, तर आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठोस पावले उचलणे हीच काळाची खरी गरज आहे.
✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.
(M.A., LL.M., M.A.J.M.C.)
भारत निर्माण आंदोलन | The Last Revolution




म्हसवड येथे मंत्री भरतशेठ गोगावले यांची बाबर कुटुंबीयांना सदिच्छा भेट

म्हसवड (ता. माण) येथे महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोद्यान मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी बाबर कुटुंबीयांना सदिच्छा भेट देत आपुलकीचा संवाद साधला.
यावेळी ॲड. इंद्रजीत बाबर व कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी मंत्री महोदयांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. भेटीदरम्यान मंत्री गोगावले यांनी नवदांपत्य इंद्रजीत व हर्षदा यांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उद्योजक निखिल देवकर व प्रा. शरयू देवकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थितांनी मंत्री महोदयांशी विविध विषयांवर चर्चा करत समाधान व्यक्त केले.
सदर भेटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.




🎤 जबरदस्त कविता सादरीकरण! ‘जग हे केमिस्ट्री’ — प्रा. डॉ. काळबेरे

🚨 ब्रेकिंग न्यूज | साप्ताहिक झुंजार भारत
🔴 ही कविता ऐकली नाही तर मोठी चूक होईल!
🟡 🎤 सुंदर कविता सादरीकरण!
‘जग हे केमिस्ट्री’ ही कविता मुधोजी महाविद्यालयात प्रा. डॉ. रविंद्र काळबेरे यांनी सादर केली.

🔗 संपूर्ण विडिओ पहा:

— झुंजार भारत

बातमी साठी संपर्क:
संपादक: ॲड. राजू भोसले
Email. zunjarbharat@gmail.com




माणगाव परिषदेतून सामाजिक बदलाची खरी सुरुवात – जिल्हाधिकारी अमोल येडगे

* ‘बहिष्कृत परिषदे’चा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
* राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

*कोल्हापूर, दि. २१* : समाजातील अनिष्ट प्रथा आणि परंपरा नष्ट करण्यासाठी १९२० साली आयोजित करण्यात आलेल्या माणगाव परिषदेतून खऱ्या अर्थाने सामाजिक बदलाची सुरुवात झाली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ व २२ मार्च १९२० रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्रातील पहिली ‘बहिष्कृत परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेचा १०६ वा वर्धापन दिन आज माणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, माणगाव परिषदेत संमत करण्यात आलेल्या १५ ठरावांवरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढील कार्याची दिशा कशी निश्चित झाली, याची प्रचिती येते. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहिष्कृत वर्गाच्या कल्याणासाठी जी महत्त्वाची पावले उचलली, त्यांचा समावेश पुढे बाबासाहेबांनी भारतीय संविधानात केला. संविधानाद्वारे समान शिक्षण, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक न्याय यांसारख्या अनेक मूलभूत घटकांना कायदेशीर अधिष्ठान मिळाले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेत बाबासाहेबांनी जगभरात जो नावलौकिक मिळवला, तो आजही समाजासाठी मोठा आदर्श आहे. या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी ‘बार्टी’ आणि सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचशील ध्वजारोहण करण्यात आले, सर्व मान्यवरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व परिसराची पाहणी केली. तसेच माणगाव परिषदेवर आधारित होलोग्राफिक शो पहिला.

२०० कोटींचा विकास आराखडा लवकरच मंजूर होईल: आ. अशोकराव माने
आमदार अशोकराव माने यांनी माणगावच्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन विविध बैठकांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मुंबईला पाठवला असून, राज्य शासनाकडून सुमारे २०० कोटी रुपयांचा हा आराखडा पुढील सहा महिन्यांत मंजूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परिषदेच्या इतिहासाबद्दल बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील बहिष्कृत समाजाला न्याय देण्यासाठी आप्पासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने ही परिषद झाली होती. शाहू महाराजांनी या परिषदेसाठी बाबासाहेबांचे नाव सुचवले आणि ही परिषद समाजाला संघटित करणारी ठरली. १५ ठरावांच्या माध्यमातून बहिष्कृत समाजाला मोठी ताकद मिळाली. ‘शिका आणि संघटित व्हा’ या मंत्राचा पाया याच ठिकाणी रचला गेला. ही केवळ एक परिषद नसून एका क्रांतीची सुरुवात होती.

माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आप्पासाहेब पाटील यांनी दोन महापुरुषांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगातही महापुरुषांचा खरा इतिहास विसरू नका असे आवाहन त्यांनी केले. अनिल कांबळे यांनी माणगाव येथील होलोग्राफीक शो, लंडन हाऊसची प्रतिकृती, परिषदेतील १५ ठरावांचा शिलालेख आणि ‘तक्या’ इमारतीच्या माध्यमातून इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सांगून युवकांनी पुस्तके आणि ग्रंथांची संगत धरावी असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, आप्पासाहेब पाटील यांचे वंशज दिलीप पाटील, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, प्रांताधिकारी दीपक शिंदे, समाज कल्याण सहायक आयुक्त सचिन साळे, शशिकांत कांबळे, अनिल कांबळे यांच्यासह अनेक नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहायक आयुक्त समाज कल्याण (कोल्हापूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी, पुणे), ग्रामपंचायत आणि बौद्ध समाज (माणगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत आणि आभार प्रदर्शन सहायक आयुक्त यांनी केले.

कार्यक्रमानंतर रूपेश निकाळजे (बीड) प्रस्तुत क्रांतीचा साक्षीदार हे एक पात्री नाटक सादर करण्यात आले. तसेच उद्या रविवारी २२ मार्च रोजी सायंकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे व कबीर नाईकनवरे प्रस्तुत प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

००००००




मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

 

फलटण : येथील मुधोजी महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रशासकिय कर्मचारी तसेच प्राध्यापकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेदरम्यान अटीतटीच्या आणि रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रा. डॉ. योगेश माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर विक्की गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
विजेत्यांचे महाविद्यालय प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेमुळे कर्मचारी वर्गामध्ये मध्ये क्रीडाभावना व स्पर्धात्मक वृत्तीला चालना मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.




राष्ट्रातील पायाभूत सुविधा मजबुतीने निर्माण करणे काळाची गरज : लेख ✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

✍️ ॲड. पुजा प्रकाश एन.

विशेष लेख :

आजच्या जागतिक परिस्थितीत कोणत्याही राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पायाभूत सुविधांची भक्कम उभारणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारत महासत्ता आणि विश्वगुरू होण्याची आकांक्षा व्यक्त करीत असताना स्वावलंबन, स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठोस पावले उचलणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भारतीय संस्कृतीने जगाला “तमसो मा ज्योतिर्गमय” आणि “अत्त दीप भव” यांसारखी उदात्त तत्त्वे दिली. अंधारातून प्रकाशाकडे जाणे आणि स्वतः प्रकाशमान होणे हा या तत्त्वांचा मूलभूत संदेश आहे. मात्र आजच्या परिस्थितीत या मूल्यांचा विसर तर पडत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्राच्या विकासाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शासनयंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि समाजाने या तत्त्वांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षांमुळे अनेक देशांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होताना दिसत आहे. उदाहरणार्थ, जागतिक राजकीय तणावामुळे इंधन आणि गॅससारख्या आवश्यक वस्तूंवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. यामुळे देशातील नागरिकांना स्वयंपाकासाठी लागणारा गॅस उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी कार्यक्रम पुढे ढकलावे लागत असून, शहरांमधील खानावळी चालवणाऱ्यांना पर्याय म्हणून चुली पेटवाव्या लागत असल्याचेही दिसून येते.
या परिस्थितीमुळे एक प्रश्न निर्माण होतो—जीवनावश्यक वस्तूंसाठी आपण अजूनही इतर राष्ट्रांवर अवलंबून का आहोत? गॅस, वीज, शेतीसाठी लागणारी खते, बियाणे आणि तंत्रज्ञान यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर देशातच होणे आवश्यक आहे. देश स्वयंपूर्ण झाला तर जागतिक संकटांच्या काळातही नागरिकांना मूलभूत अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
स्वावलंबन म्हणजे केवळ घोषणांमध्ये मर्यादित राहणे नव्हे. ज्या क्षेत्रांत आपण आयात किंवा परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून आहोत, त्या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उद्योग, संशोधन आणि तंत्रज्ञान अधिक सक्षम करणे हेच खरे आत्मनिर्भरतेचे लक्षण आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि संशोधन यामध्ये मजबूत पायाभूत सुविधा उभारल्यास देश आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतो.
गरिबी निर्मूलनाबाबत अनेक वर्षांपासून विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र केवळ अनुदान किंवा मोफत योजनांमुळे कायमस्वरूपी गरिबी दूर होत नाही, असेही अनेक तज्ज्ञांचे मत आहे. रोजगारनिर्मिती, उद्योगविकास आणि संशोधनासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारल्यास समाजातील दुर्बल घटकांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळू शकते.
पायाभूत सुविधांचा विकास केल्याने केवळ उद्योगच नव्हे तर रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. त्यामुळे गरिबांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळते. संशोधन, उत्पादन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्यास देशाची आर्थिक ताकद वाढते आणि गरिबी कमी होण्यास मदत होते.
आजच्या तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याची गरज आहे. देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण भारत घडविणे शक्य होईल.

लेखक:
— ॲड. पुजा प्रकाश एन.
(M.A., LL.M., M.A.J.M.C.)
भारत निर्माण आंदोलन – The Last Revolution




श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिसंवाद उत्साहात संपन्न


म्हसवड : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथे भाषा (मराठी, हिंदी व इंग्रजी) वाङ्मय विभागाच्या वतीने “साहित्य निर्मिती, आकलनातील संधी आणि आव्हाने : मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा आणि साहित्याचा दृष्टिकोन” या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई-परिसंवाद उत्साहात संपन्न झाला.

        या परिसंवादाचे आयोजन भाषा वाङ्मय विभाग, सिद्धवी फाउंडेशन (तेलंगणा) व महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, महाविद्यालय विकास समितीचे व्हा. चेअरमन मा. ॲड. पृथ्वीराज राजेमाने, ट्रेझरर हेमंत रानडे तसेच प्रशासकीय अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

परिसंवादाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रप्राचार्य डॉ. संजय दीक्षित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच शिवाजी विद्यापीठ गीत गाऊन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी परिसंवाद आयोजित करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले.

परिसंवादास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राणिया लॅम्पू (ग्रीस), डॉ. श्रीनिवास राव, श्री. प्रकाश कोलाराम (अमेरिका), डॉ. डिक्शन ॲडम (घाना), प्रो. जलादी रवी (आंध्र प्रदेश), डॉ. राधा नारायण, डॉ. सोनी शर्मा (बिहार) व डॉ. जगदीश दिनकर शेवते (महाराष्ट्र) यांनी उपस्थिती दर्शविली. विशेष अतिथी म्हणून डॉ. सोलोमन बेन्नी (आंध्र प्रदेश), डॉ. राजू सी.पी. (केरळ) तसेच सिद्धवी फाउंडेशनचे अध्यक्ष नागाबाबू अब्बाराजू सहभागी झाले.

मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विषयातील तज्ज्ञ म्हणून डॉ. सोनी शर्मा, डॉ. राधा नारायण आणि डॉ. जगदीश शेवते यांनी जागतिक स्तरावरील भाषाविषयक विचारांची मांडणी केली. टेक्निकल सेशनची जबाबदारी डॉ. संग्राम शिंदे (हिंदी विभाग), डॉ. सरिता माने (इंग्रजी विभाग) तर मराठी विभागाची जबाबदारी डॉ. मीरा देठे यांनी पार पाडली.

दिवसभर चाललेल्या या परिसंवादात राज्य, देश तसेच परदेशातील प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधकांनी एकूण ४२ शोधनिबंधांचे सादरीकरण केले. तसेच २३० प्रतिनिधींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
या परिसंवादाचे आयोजन इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नितीन भालके, हिंदी विभाग प्रमुख डॉ. रमेश बोबडे व मराठी विभाग प्रमुख डॉ. महेशकुमार सोनावणे यांनी केले होते.

   कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्र. प्राचार्य, आयक्यूएसीचे चेअरमन प्रा. देवेंद्र रणवरे, डॉ. जितेंद्र बनसोडे, प्रा. अंजली माने, बॉटनी विभागप्रमुख डॉ. सुजित जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नितीन भालके यांनी उपस्थित मान्यवर, अतिथी व संशोधकांचे आभार मानले. राष्ट्रगीताने परिसंवादाची सांगता करण्यात आली.




मुधोजी महाविद्यालयात अभिरूप निवडणूक प्रक्रिया उत्साहात संपन्न


फलटण : विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा तसेच मतदानाचे महत्त्व समजावे या उद्देशाने फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागामार्फत “अभिरूप निवडणूक प्रक्रिया (Mock Electoral Process)” हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

   या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कलाशाखा प्रमुख डॉ. ए. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर निवडणूक प्रक्रियेचे आयोजन राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले असून हा उपक्रम प्रा. गिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. त्यांना प्रा. प्रियांका शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमात महाविद्यालयातील विविध विद्या शाखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या अभिरूप निवडणूक प्रक्रियेत एकूण ५३६ विद्यार्थ्यांनी व १०२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी १०.०० वाजता मतदानास सुरुवात करण्यात आली असून ही प्रक्रिया दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरळीतपणे पार पडली. त्यानंतर दुपारी ३.०० वाजता मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.
या निवडणुकीत एकूण ६२६ मते पडली. त्यापैकी १६ मते बाद झाली, तर १३ मते NOTA ला मिळाली. निकालानुसार बी.ए. भाग दोनची विद्यार्थिनी तनुजा कुमकाले हिने २८१ मते मिळवून ११९ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. तर बी.ए. भाग एकचा विद्यार्थी आदित्य रणदिवे याला १५६ मते, तर बी.ए. भाग तीनचा विद्यार्थी विनय शिंदे याला १६२ मते मिळाली.
या निवडणूक प्रक्रियेत धीरज जाधव यांनी केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच शिवाजंली रणदिवे (पहिले मतदान अधिकारी), श्रुतिका कदम (दुसरे मतदान अधिकारी) आणि पायल जाधव (तिसरे मतदान अधिकारी) यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीतील मतदान प्रक्रिया, गुप्त मतदान प्रणाली, मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरला असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी –  प्रा. श्रेयस कांबळे

 

 

मराठी भाषेतील साहित्यिक यांचे कार्य उत्तम असून त्यांचे साहित्य हे दिशादर्शक व प्रेरणादाय आहे.-प्रा. श्रेयस कांबळे

मराठी भाषेतील साहित्यिक यांचे कार्य उत्तम असून त्यांचे साहित्य हे दिशादर्शक व प्रेरणादाय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे असे मत फलटण येथील विधी महाविद्यालयाचे प्रा. श्रेयस कांबळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती येथे मराठी भाषा गौरव दिन वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मांडले.

मराठी साहित्य हे आज जगभर पोहोचलेले दिसते. यामध्ये संत पंथ थोर युगपुरुष साहित्यिक कवी लेखक यांचे फार मोठे योगदान आहे. मराठी भाषा ही साधी सरळ सोपी असून ती वापरायला अधिक दर्जेदार आहे या भाषेचा गोडवा इतर भाषेपेक्षा फार निराळा आहे त्यामुळे ही भाषा आज जगभर पोहोचलेली दिसत असून त्याचा विस्तार व वाढ करण्याचे काम आपणा सर्वांच्या आहे.

यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका जाधव एम. डी., ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे, विद्या जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रेयस कांबळे पुढे म्हणाले की छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेतून राज्यकारभार सुरू करून एक समाजापुढे आदर्श निर्माण केला व मराठी भाषेचा विस्तार सुरू झाला. पुढे हीच मराठी भाषा वाढविण्यामध्ये अनेक थोर विभूतींनी आपले योगदान दिले आहे.

चक्रधर स्वामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तसेच अनेक थोर संत यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपल्या वाणीने व लेखणीने मोठे योगदान दिले आहे. ही मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांचे आहे त्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करूया.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे म्हणाले की मराठी भाषेवर अनेक आक्रमणे झाले अतिक्रमणे झाली तरी मराठी भाषा आजही जशीच्या तशी ताट मानेने उभी आहे.

मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे यासाठी दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे व इतर भाषेतील शब्द वापरणे टाळणे काळाची गरज आहे.

थोर संत, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व साहित्यिकांनी दिलेल्या योगदानातून मराठी भाषेचा कणा ताठ आहे त्यामुळे ही भाषा आपली मातृभाषा म्हणून प्रत्येकाने आईप्रमाणे जपली पाहिजे मातृभाषा टिकली तरच आपल्या अस्तित्व टिकेल त्यामुळे माय मराठी ला आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात आईचे स्थान दिले पाहिजे.

यावेळी सौ जाधव एम.डी. उपशिक्षक गायकवाड ए. आय. तसेच विद्यार्थीनी तनया जगताप यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनवलकर ए. ए. यांनी केले तर आभार कु. हन्नूरे एस.एम. यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.




फलटण | कला महोत्सवात गाजले गीत | ब्रेकिंग न्यूज