‘आदरणीय विलासरावजी देशमुख’ नावाचे एक अथांग पर्व

‘आदरणीय विलासरावजी देशमुख’ नावाचे एक अथांग पर्व. : विशेष लेख 

   “माणसं संतप्त होणारच, कारण त्यांची सुखं-दुःखं तीव्र असतात. आपण फक्त त्यांचं ऐकून घ्यायचं असतं आणि त्यांचे हात धरून त्यांना संकटातून बाहेर काढायचं असतं…” अस पक्षाला आणि प्रशासनाला सांगणारा लोकनेता म्हणजे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख होय, आज त्यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन.

पुण्यातील अलका टॉकीजच्या चौकातून गरवारे कॉलेजकडे जाणाऱ्या एखाद्या तरुणाच्या डोळ्यांत जे स्वप्न असतं, तेच स्वप्न बाभळगावच्या मातीतून आलेल्या एका राजबिंड्या तरुणाच्या डोळ्यांत होतं. आदरणीय विलासरावजी… नावाप्रमाणेच ज्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात एक अथांग विलास होता; सुसंस्कृततेचा, वक्तृत्वाचा, आणि माणसांवर अतोनात प्रेम करण्याचा!

सार्वजनिक जीवनात असे काही मोजकेच चेहरे होऊन गेले, ज्यांच्या केवळ आठवणीनेही चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांत कृतज्ञतेचे पाणी एकत्र येते. आदरणीय विलासराव देशमुख हे असंच एक ‘उमदं’ रसायन होतं. आज २०२६ च्या रखरखत्या उन्हात, जेव्हा मराठवाड्याची माती तापलेलेली आहे, शेतकरी, कामगार, कष्टकरी अडचणीत आहे, लातूरच वलय डांगाळत आहे, तेव्हा लातूरच्या वेशीवर उभं राहिल्यावर एका माणसाची उणीव काळजाला चटका लावून जाते. ते असते तर? कदाचित संकटाच्या या गडद छायेतही त्याच्या चेहऱ्यावरचं ते आश्वासक हसू पाहून आशेचे पाझर फुटले असते.

आदरणीय विलासरावजी नावाच्या महावृक्षाची पाळंमुळं बाभळगावच्या काळ्या आईत रुजलेली होती. पूर्वजांचा विचारी, सेवेचा वारसा आणि घरातलं पुरोगामी वातावरण, यांमुळे जनसेवेचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. पण या सुप्त गुणांना खऱ्या अर्थाने पैलू पाडले ते पुण्याच्या विधी महाविद्यालयाने आणि गरवारे कॉलेजच्या प्रांगणाने. पुण्याच्या सांस्कृतिक आणि वैचारिक हवेत हा तरुण अधिकच उजळून निघाला.

आदरणीय विलासरावजी कायद्याची पदवी घेऊन जेव्हा लातूरच्या न्यायालयात वकिली करू लागले, तेव्हा न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करण्यापेक्षा त्यांना कोर्टाबाहेरच्या माणसांची दुःखं जास्त ऐकू येत होती. लातूरच्या दुष्काळ निवारण समितीचे सचिव म्हणून काम करताना, दुष्काळी गावांमध्ये पायी फिरून धान्य वाटप करताना या तरुण वकिलांना समजलं की, खरं न्यायालय तर बाहेर आहे आणि तिथे न्यायाची नितांत गरज आहे. मग सुरू झाला . बाभळगावचे ‘सरपंच’ ते राज्याचा ‘शिल्पकार’! आणि देशपातळीवर लातूरचे यशस्वी नेतृत्व असा प्रवास.

सन १९८० ची ती निवडणूक… लातूरच्या राजकारणात एका देखण्या, सुशिक्षित तरुणाने पाऊल ठेवलं आणि विधानसभेची पहिली स्वारी फत्ते केली. त्यानंतर मंत्रिपदाची तालीम सुरू झाली. पहील्यादा आमदार झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत, म्हणजेच १९८२ मध्ये ते गृहराज्यमंत्री झाले. त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयाची इमारत, पोलीस वसाहत आणि शहरात तीन नवी पोलीस ठाणी उभी केली. परिवहन मंत्री म्हणून ‘गाव तिथे एसटी बस’ पोहोचवली, १९८५ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री झाले. महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम, परिवहन आणि संसदीय कामकाज यांसारख्या अष्टपैलू खात्यांचा कारभार सांभाळताना आपली मांड पककी केली. आदरणीय विलासरावांचा कारभारी म्हणून हात मऊ पण पकड घट्ट होती. मांजरा कारखान्याच्या रूपाने त्यांनी सहकाराची पहिली साखरपेरणी केली आणि लातूरचे भाग्य बदलू लागले.

पण नियतीला नेहमीच सरळ रेषा आवडत नाही. सन १९९५ च्या निवडणुकीत विलासरावांना पराभवाचा धक्का बसला. कोणताही सामान्य नेता खचून गेला असता. पण आदरणीय विलासरावजी ‘फिनिक्स’ होते. त्या चार वर्षांच्या काळात त्यांनी कुणावर टीका केली नाही, द्वेष बाळगला नाही. ते पुन्हा लोकांमध्ये गेले, त्यांची गाऱ्हाणी ऐकली. तळापासून सावरून पुन्हा उभं राहण्याची त्यांची ती ऊर्मी अचंबित करणारी होती. परिणामी, १९९९ मध्ये त्यांनी अशी काही झेप घेतली की थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावरच जाऊन विराजमान झाले.

सत्ता चालवतांना ८ पक्षांची आघाडी सांभाळत सरकार चालवणं म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं. पण विलासरावांकडे कमालीचा संयम आणि विलोभनीय संवादकौशल्याची जादू होती. राष्ट्रवादी काँग्रेस असो वा इतर मित्रपक्ष, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे ते ‘कॅप्टन’ होते. हा सत्तेचा काळ समन्वयाचा सुवर्णकाळ आणि बळीराजाचा आधार ठरला.

पूढे मुख्यमंत्री होताच त्यांनी पहिला शब्द टाकला, “माझा बळीराजा अडचणीत आहे, त्याची वीज कापली जाता कामा नये.” त्यांच्याच काळात तब्बल ४५ लाख शेतकऱ्यांची साडेआठ हजार कोटींची कर्जमाफी झाली. माहितीचा अधिकार (RTI) देणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. मुंबईचा कायापालट करताना मोनोरेल आणली, मिठी नदीचा प्रश्न सोडवला आणि गुटखाबंदीचा धाडसी निर्णय घेतला. आदरणीय विलासरावजी हे ‘विश्वासार्हतेचे’ प्रतीक होते. वादळ आल तरी आपली नौका योग्य दिशेने आणि वेगाने चालवून, सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचं सामर्थ्य आदरणीय विलासरावजी नावाच्या सुकाणूमध्ये होत.

आदरणीय विलासराव नुसतेच नेते नव्हते, ते रसिक होते, ‘व्यक्ती आणि वल्ली’ होते. त्यांच्या भाषणात जेवढी धार असायची, तेवढीच मिश्किलता त्यांच्या स्वभावात होती. विधिमंडळात त्यांच्या हजरजबाबी टिपण्यांनी विरोधकांचेही चेहरे हसून खुलायचे. यामुळे त्यांची आजही राजकारणापलीकडचा एक ‘उमदा’ नेता अशीच छाप आहे.

त्यांना संगीताची अफाट जाण होती. सुरेश भटांच्या गझला त्यांना तोंडपाठ असायच्या. चित्रपट आणि नाटकांप्रमाणेच त्यांनी महाराष्ट्राच्या लावणी आणि तमाशा कलावंतांनाही मानधन वाढवून सन्मान दिला. विद्यापीठांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांचे नाव देताना त्यांच्यातील सांस्कृतिक जाणिवा स्पष्ट दिसायच्या. ‘वर्षा’ बंगल्यावर येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याला आदराने भेटणारे, वैशालीताईंच्या साथीने आपल्या मुलांना उत्तम संस्कार देणारे ते कुटुंबवत्सल ‘अण्णा’ होते.

आज विलासरावांची आठवण दाटून येते. राजकारणात विचारधारेचा गोंधळ उडाला आहे, समाजमन दुभंगल आहे, अशा वेळी सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा तो दिलदार आणि हसतमुख चेहरा आज आपल्यात नाही, ही जाणीव राज्याला अधिकच विकल करते.

          पण विलासरावांचे विचार संपलेले नाहीत. त्यांनी शिकवलं की, संकट कितीही मोठं असो, लोकसहभागातून त्यावर मात करता येते. आज आदरणीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त केवळ त्यांचे स्मरण करणे पुरेसे नाही, तर त्यांनी जपलेला ‘विश्वास’, त्यांनी दाखवलेला ‘विकास’ आणि त्यांची ‘विचारनिष्ठा’ हाच आपला पुढचा मार्ग असला पाहिजे.

अशा आफाट स्मरणशक्तीच्या, प्रसन्न, कनवाळू आणि शब्दाला जागणाऱ्या लोकनेत्याला, महाराष्ट्राच्या या राजबिंड्या पुत्राला मानाचा मुजरा!

लेखक :  राहुल हरिभाऊ इंगळे पाटील
मो. ९८९०५७७१२८
दि. २६ मे २०२६




मोहिते वडगांव येथे मृदा परीक्षणासाठी माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

मोहिते वडगांव येथे मृदा परीक्षणासाठी माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

       मोहिते वडगांव, ता. कडेगाव, जि. सांगली (दि. २० मे २०२६) : जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय, रेठरे बु. येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत मोहिते वडगांव येथे मृदा परीक्षणासाठी माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांमध्ये मृदा परीक्षणाबाबत जनजागृती केली.


हा उपक्रम बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी श्री. हणमंतराव (आप्पा) मोहिते यांच्या शेतात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमामध्ये कृषिदूत मयूर, अनुज, विघ्नहर, कुणाल, सुशांत, तुषार, प्रविण व रणजित यांनी शेतातील विविध ठिकाणांहून योग्य पद्धतीने मातीचे नमुने कसे घ्यावेत याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच माती नमुना संकलनासाठी लागणारी साधने, नमुना घेताना घ्यावयाची काळजी आणि नमुने प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मृदा परीक्षणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, सामू (pH), सेंद्रिय कर्ब तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती समजण्यास मदत होते, अशी माहिती दिली. मृदा परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन करता येत असल्याने उत्पादन खर्चात बचत होऊन पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास श्री. जयवंत मोहिते, सौ. भाग्यश्री मोहिते, सौ. शिलावती मोहिते, श्री. दत्तात्रय मोहिते, श्री. ब्रह्मदेव सरक, श्री. महादेव मिसाळ, श्री. वसंत काळे, श्री. सदाशिव कुंभार, श्री. पांडुरंग मिसाळ आणि श्री. रामचंद्र मिसाळ आदी शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करत भविष्यात नियमितपणे मृदा परीक्षण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी विद्यार्थ्यांनी शास्त्राधारित शेती तंत्रज्ञान गावपातळीपर्यंत पोहोचवून शेतकरी व विद्यार्थी यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये मृदा परीक्षणाबाबत जागरूकता निर्माण होऊन शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले.




🌿 नात्यांचे तीन मुखवटे 🌿 जगण्याची आणि जपण्याची कला

  1. नात्यांचे तीन मुखवटे: ललित लेख 

जगण्याची आणि जपण्याची कला

नात्यांची वीण टिकवण्यासाठी कधी डोळस अंधत्व, कधी सहनशील बहिरेपणा आणि कधी संयमी मौन स्वीकारावं लागतं. समोरच्याच्या उणिवांकडे दुर्लक्ष, कटू शब्दांना माफ करणं आणि योग्य वेळी शांत राहणं हीच नाती जपण्याची खरी कला आहे. प्रेमासाठी केलेला हा अदृश्य अभिनयच नात्यांना दीर्घायुष्य देतो.

नजरेवरती पडदा टाकू, उणिवांचा हा नजारा,

चूक तुझी ही भासे मजला, देखणा तुझा नखरा।

डोळस सोडून अंधार स्वीकारू, प्रेमाच्या या रीतीने,

संसाराची वीण सांधू, समजूतदार हसण्याने॥ 

जगण्याची आणि जपण्याची कला

नात्यांची वीण टिकवण्यासाठी कधी डोळस अंधत्व, कधी सहनशील बहिरेपणा आणि कधी संयमी मौन स्वीकारावं लागतं. समोरच्याच्या उणिवांकडे दुर्लक्ष, कटू शब्दांना माफ करणं आणि योग्य वेळी शांत राहणं हीच नाती जपण्याची खरी कला आहे. प्रेमासाठी केलेला हा अदृश्य अभिनयच नात्यांना दीर्घायुष्य देतो.

नजरेवरती पडदा टाकू, उणिवांचा हा नजारा,

चूक तुझी ही भासे मजला, देखणा तुझा नखरा।

डोळस सोडून अंधार स्वीकारू, प्रेमाच्या या रीतीने,

संसाराची वीण सांधू, समजूतदार हसण्याने॥ १ ॥

तिखट बोलांची धार येता, कानांवरती आवरणे,

भाषण तुझे गाणे वाटे, लयीत तुजला सावरणे।

क्षमेचा हा कवच पांघरू, गर्वाची ही सोडून ढाल,

शांततेच्या वाऱ्याने मग, नात्याची ही राहे खुशाल॥ २ ॥

शब्दांची ही शस्त्रे आवरू, ओठांवरती शांतता,

मौनदीप हा मनात लावू, संपवून ही कटुता।

कसरत ही अभिनयाची, प्रेमासाठी केले

नात्यांची ही वेल सदा, शब्दावाचून बहरलेली॥ ३ ॥

मानवी आयुष्य म्हणजे नात्यांचा एक सुंदर पण नाजूक कोलाज. ही नाती कधी रेशमी धाग्यासारखी मऊ असतात, तर कधी काचेसारखी संवेदनशील. नात्यांचं हे विणकाम टिकवून ठेवणं ही एक मोठी जीवनकला आहे. ही जीवनकला साध्य करण्यासाठी आपल्या मुद्रेवर तीन मुखवटे परीधान करावे लागतील. हे मुखवटे म्हणजेच आंधळा, बहिरा आणि मुका होता आले पाहीजे. हा केवळ सुवीचार किंवा केवळ उपदेश नसून नातेसंबंधांच्या मंदिरातील ‘मौनदीप’ आहेत. नाती टिकवण्यासाठी एकाच व्यक्तीला अनेकदा हे तीन मुखवटे एकाच वेळी परिधान करावे लागतात. ही कला ज्याला जमली तो खरी नाती जपू आणि वाढवू शकतो.

अर्थात आपल्या नात्यात पहिला मुखवटा येतो तो म्हणजे ‘आंधळेपणा’. याचा अर्थ असा नाही की, धृतराष्ट्र सारख अंधत्व स्विकारायच तर डोळस अंधत्व असल पाहीजे. आपल्याला समोरच्याच्या चुका दिसत असतात, पण, कधी कधी डोळे असूनही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, म्हणजेच प्रेमाची पट्टी डोळ्यावर बांधणं गरजेचं असतं. समोरच्याच्या उणिवांकडे काणाडोळा करून त्याच्यातील चांगुलपणा शोधणं, हा आंधळेपणा अगतिकतेचा नसून तो समजूतदारपणाचा असतो. सर्व काही पाहणारी नजर नाती वाचवू शकत नाही; कधी कधी मुद्दाम मिटलेले डोळेच घर आणि मनं टिकवतात.

दुसरा मुखवटा आहे ‘बहिरेपणा’. नात्यांच्या प्रवासात कधी कधी कटू शब्दांचे बाण सुटतात, टीकांचे वादळ येते. अशा वेळी अहंकाराला बाजूला सारून ‘क्षमेची शाल’ पांघरून बहिरे व्हावे लागते. टोचणारे शब्द जर मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवले, तर नात्याचा ओलावा आटायला वेळ लागत नाही. ऐकूनही न ऐकल्यासारखं करणं ही सहनशीलतेची सर्वोच्च पायरी आहे. यामुळे नात्यातील संवाद जरी थांबला, तरी विसंवाद टाळता येतो.

तिसरा आणि अत्यंत कठीण मुखवटा म्हणजे ‘मुके होणं’. जेव्हा अंतर्मनात शब्दांची धार तीव्र असते, उत्तर देण्याची पूर्ण क्षमता असते, तेव्हा ओठांवर ‘मौनाचा दीप’ लावणं हेच संयमाचं लक्षण आहे. मौन म्हणजे केवळ शांत बसणे नव्हे, तर नात्यांवर चढवलेलं ते एक सुगंधी चंदन आहे. शब्दांनी झालेली जखम भरून येत नाही, पण योग्य वेळी धरलेलं मौन नात्याचं तुटणारं घर पुन्हा सांधू शकतं.

एकाच माणसाला हे तीन चेहरे सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. हे मुखवटे म्हणजे ढोंगीपणा नसून तो एक ‘अदृश्य अभिनय’ आहे, जो केवळ प्रेमापोटी केला जातो. नात्यातलं घर हे विटा-मातीपेक्षा शब्दांच्या संयमावर आणि शांततेवर उभं असतं. शेवटी, नाती शब्दांनी नाही, तर अनेकदा न बोललेल्या मौनानेच अधिक काळ टिकतात आणि बहरतात. या तीन अवस्थांतूनच नात्यांचं नाजूक विणकाम अखंड आणि अभेद्य राहते. तर मग असे मुखवटे घालून तर पहा ……

राहूल हरिभाऊ इंगळे-पाटील

रा.करकट्टा ता.जि.लातूर

मोबाईल ९८९०५७७१२८     




मुधोजी महाविद्यालयात नवनाथ येवले यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

मुधोजी महाविद्यालयात नवनाथ येवले यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

फलटण : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील वरिष्ठ लिपिक श्री. नवनाथ नारायण येवले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला गौरव सोहळा उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम होते. प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब येवले, उपप्राचार्य प्रा. सौ. उर्मिला भोसले, रजिस्ट्रार श्री. आर. वाय. गायकवाड, बारामतीचे नगरसेवक गोरख पारसे, पत्रकार अनिल सावळे पाटील तसेच सत्कारमूर्ती श्री. नवनाथ येवले उपस्थित होते.


यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, “संस्थेचे कर्मचारी सेवानिवृत्त झाले तरी ते फक्त महाविद्यालयातील सेवेतून मुक्त होतात; मात्र संस्थेच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून ते शेवटपर्यंत आमच्यासोबत राहतात.” तसेच त्यांनी येवले कुटुंब प्रतिष्ठित असून ते एकनिष्ठ व कर्तव्यदक्ष असल्याचे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नवनाथ येवले हे संस्थेवर अपार निष्ठा असलेले व्यक्तिमत्व असून त्यांनी आपल्या कुटुंबाला उत्तम संस्कार देत मुलांना उच्च शिक्षण दिले आहे, ही बाब प्रेरणादायी आहे.

यावेळी बाळासाहेब येवले, अनिल सावळे पाटील, डॉ. ए. एन. शिंदे आणि फातिमा तांबोळी यांनी मनोगत व्यक्त करून येवले यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजिस्ट्रार श्री. आर. वाय. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सागर निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. राजू भोसले यांनी मानले.

या सोहळ्यास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. श्री. नवनाथ येवले यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करत महाविद्यालयाच्या कार्यात मोलाचे योगदान दिल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




मुधोजी महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक नवनाथ येवले यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा …

       

फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील वरिष्ठ लिपिक श्री. नवनाथ नारायण येवले हे दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सन्मानार्थ सेवानिवृत्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा समारंभ गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे होणार आहे. तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे प्रमुख शुभहस्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा. प.स. सदस्य श्री. बाळासाहेब नारायण येवले व मा. सरपंच, मुंजवडी यांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. पंडितनाथ हरिभाऊ कदम यांचे मार्गदर्शन लाभणार असून, या प्रसंगी सहकारी, मित्रपरिवार व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री. नवनाथ येवले यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने काम करत महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निवृत्तीमुळे एक अनुभवी व समर्पित कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

 

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




साताऱ्यात शिवसैनिकांची मागणी : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी

📰 साताऱ्यात शिवसैनिकांची मागणी : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी

सातारा : सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली आहे. जिल्ह्यातील विविध भागांतून कार्यकर्त्यांकडून ही मागणी पुढे येत असून, यामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

                 श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू असून,  सातारा जिल्ह्याच्या राजकारणात, सहकार क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा आहे.

शिवसेनेचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, तर सातारा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे. विशेषतः फलटणसह संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी यासाठी जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.

कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, श्रीमंत संजीवराजे यांचा स्थानिक पातळीवरील संपर्क, कामाचा अनुभव आणि नेतृत्वगुण लक्षात घेता त्यांना संधी दिल्यास पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत होईल. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या मागणीची दखल घेतली जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल, अशी खात्री कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

👉 आता पक्ष नेतृत्वाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही तीव्र; जिल्हा उपाध्यक्ष रासकर एस. के. यांचा ठाम पाठिंबा, आंदोलनाला बळ

मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही तीव्र;

जिल्हा उपाध्यक्ष रासकर एस. के. यांचा ठाम पाठिंबा

झुंजार भारत | फलटण प्रतिनिधी,
महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आज चौथा दिवस असून, फलटण येथील मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन अधिक जोमाने सुरू ठेवले आहे. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन आजही कायम असून, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड एकजूट दिसून येत आहे.

जिल्हा उपाध्यक्ष रासकर एस. के. यांची भेट; आंदोलनाला बळ


महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. रासकर एस. के. यांनी आंदोलनस्थळी भेट देत कर्मचाऱ्यांच्या संपाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,
👉 “आंदोलनातील मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणे आवश्यक आहे. माझा पूर्ण पाठिंबा तुमच्यासोबत आहे.”
👉 “आंदोलन अधिक सक्रिय ठेवून एकजुटीने लढा द्या,” असे आवाहनही त्यांनी केले.

📣 मुधोजी महाविद्यालयाचा जिल्ह्यात ठळक संघर्ष

रासकर एस. के. यांनी पुढे सांगितले की, सातारा जिल्ह्यात मुधोजी महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय असून, जे या आंदोलनाची खिंड सक्षमपणे लढवत आहे.
👉 “हे आंदोलन जिल्ह्यातील सर्वात प्रभावी व ताकदीचे ठरत असून, कर्मचाऱ्यांनी उभारलेला संघर्ष उल्लेखनीय आहे,” असे त्यांनी नमूद केले.

🏅 जिल्हास्तरीय नेतृत्वाबाबत सकारात्मक भूमिका


रासकर यांनी महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व इतर राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना मुधोजी महाविद्यालयातील नेतृत्वाला जिल्हास्तरीय जबाबदारी देण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली.
👉 “मुधोजी महाविद्यालयातील नेतृत्व सक्षम असून, त्यांना जिल्हाध्यक्षपदासारखी जबाबदारी दिल्यास जिल्हास्तरीय संघटनात्मक काम अधिक जोमाने उभे राहू शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
👉 तसेच, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन संघटनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व दिशादर्शक ठरत असल्याचेही त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

👥 उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी

या आंदोलनात युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांच्या नेतृत्वाखाली संजय कामठे, ॲड. राजू भोसले, शिवाजी बुधावले, अमरसिंह घोरपडे, संदीप टिळेकर, दयानंद मागाडे, संदीप फडतरे, किरण जाधव, स्वाती निंबाळकर, फातिमा तांबोळी, कौसल्या रणदिवे,  आशालता बनकर, माधुरी कुंभार, लता कुंभार, बकुळा सावंत, महेश कदम, महादेव सूळ, विक्की गायकवाड, सुभाष शेवाळे, संजय सोनार, पोपट डांगे, प्रताप चव्हाण, दादा जावळे, दत्तात्रय बनकर, परमेश्वर लिपारे, हनुमंत वालकोळी, अनिल वाजे, लहू चव्हाण, दीपक रणदिवे, पांडुरंग चव्हाण, जगदीश बोराटे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

📍 ठिय्या आंदोलन कायम; निर्धार अधिक ठाम

महाविद्यालयाच्या गेटसमोर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच असून, “मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही” हा निर्धार कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.
कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.

⚠️ शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

या संपामुळे महाविद्यालयीन कामकाजावर परिणाम होत असून, शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे.

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)

📰 झुंजार भारत | फलटण प्रतिनिधी
📅 दिनांक: 24 एप्रिल 2026




“मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवा” – रजिस्ट्रार आर. वाय. गायकवाड यांचा ठाम पाठिंबा

“मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवा”

रजिस्ट्रार आर. वाय. गायकवाड यांचा ठाम पाठिंबा

महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आज तिसरा दिवस असून, फलटण येथील मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेले ठिय्या आंदोलन आजही कायम ठेवण्यात आले.

रजिस्ट्रार गायकवाड यांचा ठाम पाठिंबा :
मुधोजी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर. वाय. गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देत कर्मचाऱ्यांच्या संपाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,
👉 “कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्या पूर्ण होईपर्यंत संप सुरू ठेवणे गरजेचे आहे.”
तसेच त्यांनी पुढे नमूद केले की,
👉 “या आंदोलनाला प्राचार्य संघटना, शिक्षक संघटना व इतर सर्व संघटनांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे.”
👉 “सर्व मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नका. या लढ्यात माझा पूर्ण पाठिंबा आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

ठिय्या आंदोलन कायम; एकजुटीची ताकद

  1. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून आभार मानताना कर्मचारी नेते संदीप टिळेकर

मुधोजी महाविद्यालयाच्या गेटसमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले असून, मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड एकजूट दिसून येत असून, “मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच” हा निर्धार अधिक ठाम झाला आहे.

👥 उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी

या आंदोलनात युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांच्या नेतृत्वाखाली संजय कामठे, ॲड. राजू भोसले, शिवाजी बुधावले, संदीप टिळेकर, दयानंद मागाडे, संदीप फडतरे, किरण जाधव, स्वाती निंबाळकर, फातिमा तांबोळी, कौसल्या रणदिवे, शुभांगी नाईक-निंबाळकर, आशालता बनकर, अमरीन खान, माधुरी कुंभार, लता कुंभार, बकुळा सावंत, महेश कदम, महादेव सूळ, विक्की गायकवाड, सुभाष शेवाळे, संजय सोनार, पोपट डांगे, प्रताप चव्हाण, दादा जावळे, दत्तात्रय बनकर, परमेश्वर लिपारे, हनुमंत वालकोळी, अनिल वाजे, लहू चव्हाण, पांडुरंग चव्हाण, दीपक रणदिवे, जगदीश बोराटे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

⚠️ निर्णयाची प्रतीक्षा कायम
शासनाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची प्रतीक्षा असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही तीव्र; “मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच” – दिलीप कुमरे

 “मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच” – दिलीप कुमरे

आंदोलनास मार्गदर्शन करताना दिलीप कुमरे

✊ “हा न्याय हक्काचा लढा आहे” – दिलीप कुमरे

मुधोजी महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी संघटनेचे युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांनी आंदोलनस्थळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की,
 “कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा असून, मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार आहे.”
पुढे त्यांनी सांगितले की,
“उद्या शासनाकडून अधिकृत इतिवृत्त प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर समन्वय समितीची बैठक होऊन पुढील भूमिका निश्चित केली जाईल.”
“सद्यस्थितीत संप सुरूच राहणार असून, उद्या 23 एप्रिल रोजी हा संप एकजुटीने यशस्वी करायचा आहे,” असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस असून, फलटण येथील मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला आंदोलनाचा पवित्रा अधिक तीव्र केला आहे. महाविद्यालयाच्या गेटसमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन आजही कायम ठेवण्यात आले.

📍 ठिय्या आंदोलन कायम; एकजुटीचा निर्धार

महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले असून, मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड एकजूट दिसून येत असून, शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

👥 उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी


या आंदोलनात युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांच्या नेतृत्वाखाली संजय कामठे, ॲड. राजू भोसले, शिवाजी बुधावले, संदीप टिळेकर, दयानंद मागाडे, संदीप फडतरे, किरण जाधव, स्वाती निंबाळकर, फातिमा तांबोळी, कौसल्या रणदिवे, शुभांगी नाईक-निंबाळकर, आशालता बनकर, अमरीन खान, माधुरी कुंभार, लता कुंभार, बकुळा सावंत, महेश कदम, महादेव सूळ, विक्की गायकवाड, सुभाष शेवाळे, संजय सोनार , पोपट डांगे, प्रताप चव्हाण, दादा जावळे, दत्तात्रय बनकर, परमेश्वर लिपारे, हनुमंत वालकोळी , अनिल वाजे , लहू चव्हाण , दीपक रणदिवे, जगदीश बोराटे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

⚠️ उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

शासनाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता असल्याने उद्या होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




मुधोजी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा; गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू, बेमुदत संपाचा निर्धार कायम

मुधोजी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा;

नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांना निवेदन देताना मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी
नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांना निवेदन देताना मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी

गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू, बेमुदत संपाचा निर्धार कायम

महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत सुरू असलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर आज फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
यावेळी कर्मचाऱ्यांनी फलटण तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत शासनापुढे मागण्या मांडल्या. तसेच, निवासी नायब तहसीलदार श्री. अभिजीत सोनवणे यांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

👉 सदर निवेदन स्वीकारताना निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांनी या सर्व मागण्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

🚩 संपा बरोबरच महाविद्यालयाच्या गेटसमोर रोज ठराविक वेळ ठिय्या आंदोलन सुरू

मुधोजी महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी

कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र येत महाविद्यालयाच्या गेटसमोर ठाण मांडून बसले आहेत.

👉 “मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

📢 शासनाच्या दुर्लक्षामुळे संप तीव्र

समन्वय समितीच्या वतीने मागील १५ महिन्यांपासून सातत्याने आंदोलन, निवेदने व पाठपुरावा करूनही शासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट न मिळाल्याने आणि विधानसभेत मान्य झालेल्या मागण्यांवरही अंमलबजावणी न झाल्यामुळे अखेर २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

🏫 परीक्षा व प्रशासकीय कामकाजावर परिणाम

सध्या विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू असताना या संपामुळे परीक्षा प्रक्रिया, निकाल, तसेच महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवरही त्याचा परिणाम जाणवू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

📌 प्रमुख प्रलंबित मागण्या.

कर्मचारी संघटनेने शासनाकडे खालील महत्त्वाच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे:

1. ✅ जुनी पेन्शन योजना लागू करावी (१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी)
2. ✅ रिक्त पदे तातडीने भरावीत व चतुर्थश्रेणी भरतीवरील बंदी उठवावी
3. ✅ १०:२०:३० आश्वासित प्रगती योजना लागू करावी
4. ✅ सेवानिवृत्तीचे वय 60 करा
5. ✅ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समान न्याय व वेतन संरचना द्यावी
6. ✅ कंत्राटी, तात्पुरत्या व अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे
7. ✅ सेवाशर्ती स्पष्ट करून पदोन्नती, वेतनवाढ व सेवा संरक्षण सुनिश्चित करावे
8. ✅ आरोग्य विमा व सर्वसमावेशक वैद्यकीय सुविधा लागू कराव्यात
9. ✅ निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभ तातडीने लागू करावेत
10. ✅ प्रलंबित आर्थिक व प्रशासकीय प्रश्न तत्काळ निकाली काढावेत
11. ✅ रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण कमी करण्यासाठी तातडीने भरती करावी

12. ✅ शैक्षणिक संस्थांमध्ये आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
13. ✅ अन्यायकारक निर्णय व धोरणांवर पुनर्विचार करून सुधारित शासन निर्णय जारी करावेत

✊ घोषणाबाजी करत आंदोलन तीव्र

तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी
“आमच्या मागण्या मान्य करा!”,
“शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा, विजय असो!”
अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की,
👉 “मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही.”

👥 उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी

    या आंदोलनात युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांच्या नेतृत्वाखाली संजय कामठे, ॲड. राजू भोसले, शिवाजी बुधावले, संदीप टिळेकर, दयानंद मागाडे, संदीप फडतरे, अमरसिंह घोरपडे, किरण जाधव, स्वाती निंबाळकर, फातिमा तांबोळी, कौसल्या रणदिवे, शुभांगी नाईक-निंबाळकर, आशालता बनकर, अमरीन खान, माधुरी कुंभार, लता कुंभार, बकुळा सावंत, महेश कदम, महादेव सूळ, विक्की गायकवाड, सुभाष शेवाळे, संजय सोनार , पोपट डांगे, प्रताप चव्हाण, दादा जावळे, दत्तात्रय बनकर, परमेश्वर लिपारे, हनुमंत वालकोळी , अनिल वाजे , लहू चव्हाण , दीपक रणदिवे, जगदीश बोराटे , योगेश आडके आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

⚠️ शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा – मागणी

या संपामुळे शैक्षणिक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या निकाली काढाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)